सोलापूर (Solapur) : पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगाने विविध सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला विधीमंडळाच्या याच अधिवेशनातील (२७ जूनपासून सुरू होणाऱ्या) अंदाजपत्रकात टोकन निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्याबाबतचा मागणी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मान्यतेच्या अनुषंगाने आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, या आराखड्यातील सोयी सुविधा जागतिक दर्जाच्या निर्माण करण्यात येणार असल्याने अशा सुविधा देणाऱ्या संस्थांची निवड करावी. या प्रस्तावित केलेली सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची होऊन देश विदेशातील पर्यटकांना समाधानकारक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याच अनुषंगाने स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ निर्माण होणार असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने हा पर्यटन आराखडा खूपच महत्त्वपूर्ण आहे.
उजनी धरण जलपर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन व विनयार्ड पर्यटन असे चार मुख्य घटकअंतर्भूत असलेला सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यासमोर प्राथमिक स्तरावर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण झाले आहे. पालकमंत्री पाटील यांनी आज या आराखड्याला मान्यता दिल्याने आजच हा आराखडा शासनाला सादर केला जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होऊन येथे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास आहे.
- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी
धार्मिक पर्यटनाचाही विकास
या प्रकल्पांतर्गत उजनी परिसरात मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, एक हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम, रॉकपूल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाइट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाइंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रूझ सफारी, ॲक्वेटिक लाइफ यासह अन्य सुविधांचा समावेश आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर व हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचाही धार्मिक पर्यटन स्थळांतर्गत विकास केला जात आहे.