
वाई (Wai) : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळत नसल्याने वाई तालुक्यातील कृष्णा नदीपत्रातील सर्व वाळू टेंडर रद्द कराव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, की वाई तालुक्यातील अनेक लाभार्थी यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. शासकीय निकषाप्रमाणे ते बांधण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी पहिला हफ्ता मिळाला आहे. या लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणे संबंधी शासनाने आदेश काढला आहे. त्या अनुषंगाने वाळू परवाना मिळण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत; परंतु १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही अद्याप वाळू परवाने मिळाले नाहीत.
महाखनिज संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक वेळा बुकिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऑनलाइन स्टॉक दाखवला जात नाही. इतरत्र वाळू वाहतूक होताना दिसते; पण घरकुल लाभार्थ्यांसाठी मात्र वाळू उपलब्ध होत नाही. तालुक्यात आतापर्यंत १७७ जणांना मोफत वाळूचे पास मिळालेले आहे. त्यापैकी फक्त ९८ जणांना वाळूचा लाभ मिळालेला आहे. मग उर्वरित लोकांना वाळू मिळाली नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळाली नाही, तर कृष्णा नदीपात्रात सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. सर्वसामान्य घरकुल लाभार्थ्याला वाळू मिळणार नसेल, तर नदीपात्रातील वाळू उपशासाठी देण्यात आलेल्या सर्व टेंडर या रद्द करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर स्वप्नील गायकवाड, श्रीकांत निकाळजे, रूपेश मिसाळ, सुनील मांढरे, बाजीगर इनामदार आदीच्या सह्या असून, या वेळी अनेक लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते.