
अहिल्यानगर (Ahilyanagar) : शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. अशात दिल्लीगेट वेस ते चौपाटी कारंजा व चितळे रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत होती. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुढाकार घेऊन तेथील अतिक्रमणधारक पथविक्रेते, हातगाडी विक्रेत्यांना मानकर गल्ली पटांगणात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिल्लीगेट ते चितळे रस्ता या भागातील रहदारीचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे.
दिल्ली गेट वेस, चौपाटी कारंजा व चितळे रस्ता हा कायम रहदारीचा रस्ता असून, अतिक्रमणांमुळे या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत होती. अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम होता. अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिकांना, वाहनचालकांना सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत होते.
आयुक्त डांगे यांनी या प्रकरणात लक्ष घालून तेथील अतिक्रमणधारक विक्रेत्यांना जवळच असलेल्या मानकर गल्ली पटांगणात बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली.
सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत तात्पुरत्या स्वरूपात ही जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारपासून या विक्रेत्यांचे या जागेत स्थलांतर करण्यात आल्याने रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी मार्गी लागणार आहे.
नेहरू मार्केटचा जागेवर व्यापारी संकुल
महानगरपालिका नेहरू मार्केटच्या जागेत भाजी मंडईसह व्यापारी संकुल उभारत आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या माध्यमातून चितळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येत्या काळात चितळे रस्त्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ज्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे, त्यांनी रस्त्यावर व्यवसाय केल्यास, महानगरपालिका कठोर कारवाई करणार, असा इशाराही आयुक्त डांगे यांनी दिला आहे.