

मुंबई (Mumbai): ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत सन 2026-27 च्या वार्षिक योजनांना मंजुरी देण्यात आली असून सर्वसाधारण योजना 660 कोटी, आदिवासी उपयोजना 140 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 107कोटी अशा तरतुदींसह सुमारे 1700 कोटी प्रस्तावित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील सर्व विकासकामे नियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण पूर्ण झाली पाहिजेत आणि 100 टक्के निधी खर्च झाला पाहिजे. कोणताही विभाग हलगर्जीपणा करत असल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. तांत्रिक मान्यता, आराखडा तयार करणे, प्रस्ताव सादर करणे व निधी वेळेत खर्च करण्यावर भर देण्यात आला असून पीपीपी माध्यमातून होणाऱ्या कामांची विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता सुनिश्चित करावी असे निर्देश दिले.
पावसाळ्यापूर्वी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून रस्तेदुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरी पॅचवर्क मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, नागरिकांना गैरसोय होऊ नये व अपघात टळावेत यासाठी खबरदारी घ्यावी असे आदेश देण्यात आले. धोकादायक इमारतींना क्लस्टर पुनर्विकासात प्राधान्य देण्यास सांगण्यात आले असून जिल्हाधिकारी, महापालिका, पोलिस व आपत्ती व्यवस्थापन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी शेल्टर उभारणे, निर्बीजीकरण आणि ॲनिमल ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून साथीचे आजार टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क राहावी असे सांगण्यात आले तसेच सिव्हिल हॉस्पिटल लवकर सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश देण्यात आले.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोचा डीपीआर मंजूर झाला असून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, वॉटर टॅक्सी, छेडा नगर ते गायमुख एलिव्हेटेड रस्ता, साकेत-कोलशेत-मीरा भाईंदर जोडणी, नाशिक रोड फ्लायओव्हर आदी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून खारेगाव पूल लवकर सुरू करण्यात येणार असून मेट्रो प्रकल्पातील अडचणी सोडवण्याचा पाठपुरावा सुरू आहे.
पाणीपुरवठ्यासाठी धरणातून मीरा-भाईंदर व वसईला पाणी देऊन उर्वरित 100 एमएलडी पाणी ठाण्यासाठी मिळणार आहे तसेच काळू धरणाचे काम वेगाने सुरू असून पुनर्वसन व मोबदल्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. मुंबई महापौर निवडणुकीत महायुतीला मिळालेला कौल हा रस्ते, मेट्रो, कोस्टल रोडसह विकासकामांवरील विश्वास असल्याचा दावा त्यांनी केला. पावसाळ्यापूर्वी संपूर्ण ठाणे जिल्हा अलर्ट ठेवून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व यंत्रणांना कामाला लावले असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.