

मुंबई (Mumbai): तळेगाव-चाकण-शिक्रापूर या हाय-ट्रॅफिक कॉरिडॉरवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा मार्ग (राष्ट्रीय महामार्ग ५४८-डी) पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा कणा आहे. हा रस्ता रांजणगाव, चाकण, तळेगाव या प्रमुख एमआयडीसी आणि मुंबईला जोडणारा मुख्य दुवा आहे. दररोज हजारो अवजड वाहने, कंटेनर्स आणि स्थानिक नोकरदारांची वाहने या मार्गावरून धावतात. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथे तासनतास वाहतूक कोंडी होत असते, ज्यावर आता कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता, या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाद्वारे (MSIDC) हे काम केले जाणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
या रस्त्यामुळे चाकण परिसरातील ट्रॅफिक जामची समस्या ७० ते ८० टक्क्यांनी कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच केवळ रस्ता दुरुस्तीच नाही तर भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्त्याचे रुंदीकरण तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आणि इंधनाची बचत होण्यास मदत होईल.
हा रस्ता पूर्ण झाल्यावर पुण्यातील 'लॉजिस्टिक हब'ला मोठी चालना मिळणार असून, एमआयडीसीतील कंपन्यांच्या उत्पादनांची वाहतूक अधिक जलद गतीने शक्य होणार आहे. विधान परिषदेत आमदार योगेश टिळेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी ही माहिती दिली.