
मुंबई (Mumbai): मुंबईतील महत्त्वाकांक्षी अभ्युदय नगर आणि कामाठीपुराच्या समूह पुनर्विकासासाठी विकासकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे म्हाडाने (MHADA) दोन्ही टेंडरना (Tender) मुदतवाढ दिली आहे.
'बांधकाम व विकास' या तत्त्वावर विकासक नेमण्यासाठी म्हाडाने हे टेंडर काढले आहे. अभ्युदय नगरच्या पुनर्विकास टेंडरला 14 ऑगस्टपर्यंत तर कामाठीपुराच्या टेंडरला 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अभ्युदय नगरला सद्यस्थितीत 48 इमारती असून 208 चौरस फूट आकारमानाची 3410 घरे आहेत. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये टेंडर काढले आहे. पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन घराचे चटई क्षेत्रफळ किमान 635 चौरस फूट असावे, अशी अट म्हाडाने घातली होती. सहा वेळा मुदतवाढ देऊनदेखील एकाही विकासकाने टेंडर भरले नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मंजुरीने म्हाडाने पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ 635 वरून 620 पर्यंत कमी करत विकासक नेमण्यासाठी नव्याने टेंडर काढले आहे.
दुसरीकडे, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत कामाठीपुराचा समूह पुनर्विकास करण्यात येणार असून एजन्सी नियुक्त करण्यासाठी 12 जून रोजी टेंडर काढण्यात आले आहे. पुनर्विकासातून येथील 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटाचे हक्काचे घर मिळणार आहे.
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासासाठी झालेल्या बिडपूर्व तांत्रिक बैठकीत कल्पतरू, रुस्तमजी आणि महिंद्रा लाईफ स्पेस या तीन कंपन्यांनी तर कामाठीपुरा पुनर्विकासासाठी झालेल्या बिड पूर्व तांत्रिक बैठकीत रेमंड रियालिटी आणि अशदान प्रॉपर्टीज प्रा. लि. या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.