

मुंबई (Mumbai): समतानगर कांदिवली (पूर्व) येथील मध्यम उत्पन्न गटाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम १ एप्रिल २०२६ पासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. या कामाच्या प्रगतीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल. या कामात विलंब झाल्यास विकासकावर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषदेत या विषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर, अनिल परब यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
मंत्री देसाई म्हणाले, समतानगर येथील प्रकल्पासंदर्भात राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या प्रकल्पातील ३१८ निष्कासित सदनिकाधारकांपैकी ३१० जणांचे भाडे मार्च २०२६ पर्यंत देण्यात आले असून उर्वरित आठ जणांचे भाडे देण्याचे आदेशही देण्यात येतील. तसेच दरवर्षीचे भाडे आगावू देण्याबाबत सूचित केले जाईल.
तसेच भाडेकरूंना देय असलेल्या भाड्याबाबत कोणतीही तक्रार राहू नये, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
अधिवेशन संपल्यानंतर सर्व संबंधितांची या विषयी पुन्हा बैठक घेतली जाईल. या बैठकीस लोकप्रतिनिधी, म्हाडा अधिकारी तसेच गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाडेकरूंचे प्रतिनिधी यांनाही निमंत्रित केले जाईल असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.