
मुंबई (Mumbai) : मुंबईमध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामावर नियंत्रण ठेवणे आणि दर्जा राखण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस दर्जाच्या) अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबाबत महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, नेमणूक करण्यात आलेला अधिकारी हा काँक्रिटीकरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासोबतच कामाचा दर्जा तपासणे, कामांमध्ये समन्वय ठेवणे, दर्जाहीन काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणे अशी जबाबदारी पार पाडणार आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि भविष्यात यामध्ये कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत. मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा आणि त्यांना दर्जेदार रस्ते मिळावेत हा या निर्णयामागचा हेतू असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
दृष्टीक्षेपात मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण -
मुंबईतील सुमारे २०५० किमी लांबीचे रस्ते मुंबई महानगरपालिकेच्या अख्यतारित आहेत. महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा दीर्घकालीन कार्यक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते), तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्ते) अशा एकूण ७०१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभागातील एकूण ५०३ रस्त्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ६,०७८ कोटी रुपयांच्या कामांसाठी टेंडर मागवण्यात आली होती. ती कामे पूर्ण होत नाही तोच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व रस्त्यांच्या कामासाठी पुन्हा टेंडर काढण्यात आली. ही सर्व कामे आता सुरू असून ती २०२७ पर्यंत चालणार आहेत. यासाठी अनेक चांगले रस्तेही उखडून नव्याने केले जाणार आहेत.