
मुंबई (Mumbai) : जागतिक बँकेसोबत झालेल्या 2300कोटी रूपयांच्या कराराच्या आधारे कौशल्य विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून आगामी शंभर दिवसात 50 हजार युवांना प्रशिक्षण देणार असून मुंबईबरोबरच नागपूर, पुणे, नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितले.
मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत करत असलेल्या कार्यवाहीची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणाऱ्या संस्थाबाबत सर्वसमावेशक असा एकत्रित कायदा करणार असून, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत 500 विविध अभ्यासक्रमांचे व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे 1000 शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. जागतिक बँकेसोबत झालेल्या कराराआधारे आयटीआयची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. राज्य नाविन्यता कौशल्य विकास सोसायटी मार्फत ‘आयटीआय’च्या कौशल्य विकास केंद्रामार्फत १ लाख १० हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयटीआय तसेच व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा ऑनलाईन करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात 100 रोजगार मेळावे आयोजित केले जातील.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात विभागाचे संकेतस्थळ अद्यावत करणे, कार्यालयातील सोयी व सुविधा वाढवणे, सुकर जीवनमान, गुंतवणूक प्रसार, जनतेच्या तक्रारींचे निवारण, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या कृती कार्यक्रमावर भर देणार असून विभागाचा कारभार अधिक गतीमान करण्यात येणार आहे. 1000 विविध सामंजस्य करार करण्यात आले आहे. कौशल्य विद्यापीठात मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने आर्टिफिशीयल इंटिलिजेसचे 10 हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचेही लोढा यांनी यावेळी सांगितले.