
मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास झाल्याशिवाय महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनू शकणार नाही, असे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विधानसभेत सांगितले.
यावेळी बोलताना शेख म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशात पैसे दिल्याशिवाय कोणीही आयुक्त बनू शकत नाही. अशा स्वरूपाचा कारभार नगर विकास विभागात आहे. जे आयुक्त आले त्यांनी विकास आराखडा बनविला त्याचा प्रादेशिक विकास आराखड्यास कसलाही ताळमेळ नाही. फक्त दुकान उघडून बसले आहेत. अशा स्वरूपाचे जर आपण शहरे निर्माण करत असू तर महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, असे आमदार शेख यांनी यावेळी नमूद केले. भिवंडी आणि मुंबई महानगर प्रदेशातील परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल आणि अद्ययावत अशा स्वरूपाच्या गरजेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मागील पाच वर्षापासून करतोय पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. जर सरकार ग्राउंड वर उतरून काम करत नसेल तर राज्यपालांनी अभिभाषणातून जी स्वप्ने दाखविली ती स्वप्नेच राहतील, असेही आमदार शेख यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की ठाणे ते कल्याण जाणाऱ्या मुंबई मेट्रो मार्ग ५ चे ९४ टक्के काम पूर्ण झाले असले तरी अजूनही सिस्टम इंस्टॉलेशनची टेंडर प्रक्रिया झालेली नाही. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास झाला तर महाराष्ट्र पुढे जाईल आणि पर्यायाने देश पुढे जाईल, असे आमदार शेख म्हणाले. वस्त्रोद्योगविषयी बोलताना शेख यांनी महाराष्ट्राचा ६० टक्के व्यवसाय गुजरातला गेल्याचे सांगितले. एकेकाळी वस्त्रोद्योगासाठी महाराष्ट्र ओळखला जायचा. सरकारने याबाबत गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे, असे शेख म्हणाले.