
मुंबई (Mumbai) : मुलुंड ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ऐतिहासिक तीन मूर्ती मंदिरापर्यंत प्रस्तावित असलेल्या रोपवे (केबल कार) प्रकल्पाचा सविस्तर अहवाल राज्याच्या पर्यटन विभागाने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवला आहे. मुंबईतला हा पहिला रोपवे असून यामुळे मुंबईच्या पर्यटन स्थळात भर पडणार आहे.
आमदार मिहीर कोटेचा यांच्या मागणीचा संदर्भ देत राज्याच्या पर्यटन विभागाने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे. रोपवे बाबत नियम, प्रकल्पाचे तपशीलवार अंदाजपत्रक, प्रकल्पाचे लाभ, पर्यटन स्थळाच्या विकासाला मिळणारी चालना यासंदर्भात प्रस्तावावरील टिप्पण्यांसह तपशीलवार अहवाल सादर करा, असे पर्यटन विभागाने पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करताना आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, मी या प्रकरणाचा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग आणि इतर संबंधित सरकारी विभाग व अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या रोपवेमुळे शहरातील पर्यटन स्थळांमध्ये एका ठिकाणची भर पडणार आहे. या रोपवे प्रकल्पामुळे सहलीचे उत्तम ठिकाणही निर्माण होईल. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसराचा मुंबईकरांना आनंद घेता येणार आहे.
डिसेंबरमध्ये मिहीर कोटेचा यांनी राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. संजय गांधी राष्ट्रीय पार्क (एसजीएनपी) परिसरात नयनरम्य टेकडीच्या माथ्यावर ऐतिहासिक ‘तीन मूर्ती मंदिर’ आहे. मंदिरात भाविकांना सहज प्रवेश मिळावा यासाठी येथे रोपवे बांधणे आवश्यक आहे. सध्या भाविकांना मंदिरापर्यंत पायी जावे लागते. मंदिरापर्यंत पोहोचणे सध्या कष्टप्रद आहे. भाविकांच्या सोयीसाठी रोपवे बांधण्यात येईल, असे कोटेचा यांनी सांगितले. मिहीर कोटेचा पुढे म्हणाले की, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षित हरित क्षेत्राला कोणतीही बाधा न आणता मंदिर परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जावू शकते. ‘व्ह्यूइंग गॅलरी’सारख्या सुविधा येथे उभारता येऊ शकतात. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढेल आणि मुंबईच्या पर्यटन स्थळात आणखी एका स्थळाची भर पडणार आहे.