Ulwe Coastal Road: नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरणाऱ्या प्रकल्पाबाबत काय आली अपडेट?
नवी मुंबई (Navi Mumbai): नवी मुंबईमध्ये सध्या दळणवळण अधिक सोपे करण्यासाठी सिडकोकडून अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील एक महत्त्वाचा आणि केंद्रस्थानी असलेला प्रकल्प म्हणून उलवे किनारी मार्ग ओळखला जात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नवी मुंबईतील वाहतूक खूप सुलभ होणार आहे.
हा मार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जेएनपीटी, नवी मुंबई सेझ आणि आम्र मार्ग यासारख्या प्रमुख ठिकाणादरम्यान कनेक्टिव्हिटी बळकट करणारा एक मजबूत दुवा ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची आतापर्यंत ६० % काम पूर्ण झाले आहे आणि तो नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या दिशेने सिडकोचे प्रयत्न सुरु आहेत.
उलवे किनारी मार्गाची अंदाजे लांबी सात किलोमीटर असून तो सहा पदरी (३+३) उन्नत मार्ग असणार आहे. या मार्गाचे दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला ५.८० किलोमीटर लांबीचा किनारी मार्ग आणि दुसरा ०.९०३ किलोमीटर लांबीचा एअरपोर्ट लिंक रोड, जो जागतिक दर्जाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडेल. हा आधुनिक द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यावर नवी मुंबईला जागतिक व्यापार आणि दळणवळणाचे एक महत्त्वाचे प्रवेशद्वार बनवण्यास मदत करेल.
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मतानुसार, हा प्रकल्प सध्याच्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासह संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासासाठी निर्णायक भूमिका बजावेल. एकदा पूर्णत्वास गेल्यानंतर, उलवे किनारी मार्ग हा नवी मुंबईतील परिवहन व्यवस्था सक्षम करणारा आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा एक ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे एमटीएचएल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आम्र मार्ग यांच्यादरम्यान अखंड आणि सिग्नलविरहित प्रवास करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर, सध्या अस्तित्वात असलेल्या पाम बीच मार्ग, आम्र मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ३४८ या मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याचे कामही हा मार्ग करेल. या सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे, ज्यामुळे प्रवासी, मालवाहतूक आणि प्रादेशिक व्यापार या सर्वांना मोठा फायदा होईल.
रस्त्याची मजबुती आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या प्रकल्पात उड्डाण पूल, मोठे पूल, रेल्वे मार्गावरील पूल आणि इतर महत्त्वाची बांधकामे समाविष्ट आहेत. जमिनीची क्षमता वाढवण्यासाठी खास ग्राउंड-इम्प्रूव्हमेन्ट तंत्रे वापरली जात आहेत. यामध्ये प्रीफॅब्रीकेटेड व्हर्टिकल ड्रेन्स आणि दगडी खांब यांचा वापर होत आहे. तसेच, रस्त्याच्या भरावासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेतून प्राप्त झालेले साहित्य वापरले जात आहे.
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी संपूर्ण मार्गावर आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामध्ये ऊर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग, अपघातांपासून संरक्षण देणारे अँटी-क्रॅश बॅरिअर आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे.
देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प आणि सर्वाधिक लांबीचा सागरी पूल यांना जोडणारा उलवे किनारी मार्ग हा एक महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प आहे, जो नवी मुंबईला प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या शाश्वत अभियांत्रिकी आणि दूरदृष्टीच्या नागरी नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे.

