छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : भीमनगर-भावसिंगपुरा परिसरातील साई कंपाऊंड ते ग्लोरिया सिटी या मार्गावरील नाल्यावरील ग्राम पंचायतीच्या काळात बांधण्यात आलेल्या तीन लहान नळकांडी पूलांचे बांधकाम करण्याची मागणी माजी नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या व माजी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती मनिषा विनोद लोखंडे यांनी विभागीय आयुक्त, महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत तसेच स्मार्ट सिटीच्या संचालकांकडे केली आहे. पुलांचे बांधकाम न केल्यास महापालिका व स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या इमारतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत लोखंडे यांनी उपरोक्त उल्लेखीत अधिकार्यांना १५ फेब्रुवारी रोजी निवेदन सादर केले आहे.
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून साई कंपाऊंड ते ग्लोरिया सिटी या रस्त्याचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याकासाठी सात कोटींचा निधी मंजूर केला आहे. कंत्राटदार ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत असलेल्या या बांधकामात या रस्त्यावर असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या पुलांच्या बांधकामाला बगल देण्यात आलेली आहे. हे धोकादायक पुल पाडुन नव्याने बांधकाम करणे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी वाहुन नेण्यासाठी भुमिगत गटार बांधणे व फुटपाथ तयार करावा अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे. दरम्यान "टेंडरनामा" प्रतिनिधीशी बोलताना लोखंडे यांनी सांगितले. स्मार्ट सिटी रस्ते विकास योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या भीमनगर - भावसिंगपुरा परिसरातील साई कंपाऊंड ते ग्लोरिया सिटी या रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर ४० वर्षांपूर्वीचे जुने तीन नळकांडी पुल आहेत, जे की अत्यंत जीर्ण झालेले आहेत. याआधी सदर पुल अनेक वेळा पुरामुळे खचलेले आहेत. सदर पुलांची अनेक वेळा डागडुजी करण्यात आली होती. परंतु स्मार्ट सिटी तर्फे सदरील पुल तोडुन नवीन बांधण्याऐवजी केवळ भराव टाकून त्यावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हे पुल पावसाळ्यात येणाऱ्या पावसाच्या पुराच्या प्रवाहापुढे अत्यंत कमी उंचीचे व छोटे पडतात. कारण पाण्याचा प्रवाह मोठा असतो.
सदरील पुल तुटपुंजे असल्यामुळे पुराचे पाणी हे जवळपास ३०० ते ४०० फुटापर्यंत रस्त्यावर येऊन आजुबाजुच्या नागरी वसाहतींमध्ये घुसते. हे नळकांडी पुल जीर्ण झालेले असल्याने अनेक वेळा पुलाचा मलबा व दगड ढासळतात व तसेच पाइपही खराब झालेले आहेत. पूर्वी या नाल्यांच्या आजुबाजुला शेती व मैदाने असल्याने सदरील पाणी वाहुण जात होते. परंतु आता नाल्याच्या लगत लोकवस्ती वाढल्याने सदरील पुराचे पाणी हे पुल अरुंद असल्याने थेट आजुबाजुच्या परिसरात शिरते. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना जाण्यासाठी रस्त्याच राहत नाही. या रस्त्यावरील ग्लोरिया सिटी तसेच दर्गा परिसरातील व के. टी. हाइट्स येथील शेकडो रहिवाशांनी लोखंडे यांच्याकडे नवीन पुल बांधण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.पावसाळ्यात पुराचे पाणी वसाहतीत शिरेल म्हणून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे व तसेच रस्त्याची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी स्ट्राॅम वाॅटर यंत्रणा व फुटपाथ तयार करावेत, अशी लोखंडे यांची मागणी आहे.