छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : महापालिकेच्या उद्यान अधीक्षक तथा वृक्षप्राधिकरण कार्यालयांतर्गत उद्यान विभाग येतो. याच विभागांतर्गत लिमयेवाडी, मित्रनगर, विष्णुनगर, सिंधी काॅलनी, जवाहर काॅलनीतील नागरिकांसाठी लिमयेवाडीत उद्यान आहे. हे उद्यान विभागाच्या देखरेखीत येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील उद्यानांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याचा प्रत्यक्ष लेखाजोखा प्रतिनिधीने घेतला असता येथे उद्यान होत्याचे नव्हते झाल्याचे दिसले.
स्थानिक नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, बाळगोपाळ यांना विरंगुळा लाभावा, आजी आजोबांना काही क्षण निवांत वेळ घालवता यावा, ज्येष्ठ मित्र मंडळीला मनमोकळ्या गप्पा मारता याव्यात यासाठी येथे एकर भर जागेत उद्यानांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आज हे उद्यान अखेरच्या घटका मोजत असताना दिसून आले आहे. उद्यान साफसफाई तसेच उद्यानातील खेळण्या, बाकडे असो यातील विविध कामांच्या देखरेखीची जबाबदारी उद्यानाच्या कृषी सहाय्यक, उद्यान निरिक्षक यांना देण्यात आली आहे. उद्यान विभागाकडून दरमहा अशा कर्मचार्यांना जनतेच्या करातुन हजारोचा पगार दिला जातो. साफसफाई तसेच देखरेखीच्या मोबदल्यात मात्र परिणाम शुन्य दिसतो. खालच्या अधीकाऱ्यांची बेपर्वाई अन् वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे उद्यानाची सद्यःस्थितीत दुरवस्था झाली आहे.
येथील उद्यानातील तुटलेली खेळणी, पथदिपकांची दुरवस्था आणि मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. गवताडात हरवलेल्या उद्यानात मद्यपींचा राजरोस धिंगाणा चालतो. येथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक गरजेची असल्याचे व सामाजीक सभागृहाची मागणी नागरिक करत आहेत. नाव उद्यान मात्र एकही विविध प्रजातींची रोपांची येथे लागवड केली नाही. जॉगिंग ट्रॅक होत्याचा नव्हता झाला आहे. यासंदर्भात टेंडरनामा प्रतिनिधीने लिमयेवाडी व मित्रनगरातील नागरिकांशी चर्चा केली असता उद्यानाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असून, या आधी देखिल महापालिका आयुक्तांचा पाहणी दौरा झालेला आहे. मात्र आयुक्त बदलतात, आश्वासने हवेत विरतात. परिणामी आजपर्यंत काहीही उपाययोजना झालेली नसून येथील साहित्य देखिल लंपास झालेलं आहे. वेळोवेळी मागण्या करूनही येथे काही उपाययोजना करण्यात येत नाही. रात्रीच्या सुमारास मद्यपींचा येथे मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ असतो. यामुळे येथे सीसीटीव्ही लावणे गरजेचे असून येथे दिवस व रात्रीसाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
उद्यानाची स्वच्छता होणे अत्यंत गरजेचे असून वेळोवेळी याबाबत उद्यान निरीक्षकांना देखील सांगण्यात येत असते. मात्र यावर काही उपाययोजना होत नाही. येथील समस्यांबाबत प्रशासनास पत्र व्यवहार केलेले असून उपाययोजना होत नसल्याने आता उद्यानाची देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार थांबवा, असे आयुक्तांना निवेदन देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. उद्यान अधीक्षकांवर देखील कार्यवाही होणे अत्यावश्यक असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. उद्यानातील पथदिपकांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली असून, सायंकाळच्या वेळेस येथे टवाळखोरांचा उद्रेक होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यांची देखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाने एकदा येऊन येथे झालेल्या नुकसानीचा पंचनामा तयार करून पुढील उद्यान विकासाचे अंदाजपत्रक तयार करून उद्यान या नावाला शोभेल असे विकास कार्य करण्याची मागणी नागरिक करत आहेत.