
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : एकीकडे शिवाजीनगर रेल्वे गेट क्रमांक-५५ येथे भुयारी मार्गाचे काम सुरू केल्याने रेल्वे गेट गत महिन्याभरापासून बंद करण्यात आले आहे. दरम्यान सातारा-देवळाई व बीड बायपासकरांसाठी वाहतूक शाखेने दिलेल्या पर्यायापैकी गोदावरी ढाबा ते संग्रामनगरपूलाखालील जोडरस्ता महानगरपालिकेच्या जुन्या जलवाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी खोदला जात आहे. विशेष म्हणजे जी-२० च्या काळात काही महिन्यांपूर्वीच या जोडरस्त्याचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जागतीक बॅक प्रकल्प शाखेने केले होते, असे ॲड. शिवराज कडू पाटील यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
आधी रस्ते तयार करा, काही महिन्यानंतर पुन्हा ते खोदा, असे छत्रपती संभाजीनगरातील सार्वजनिक बांधकाम विभाग असो, की महानगरपालिका यांचे हे एक समीकरण बनले आहे. खड्ड्यांबाबत आणि उरफाटा कारभाराबाबत नेहमीच टीकेचे धनी होणार्या या दोन्ही विभागांनी आता एकत्र येत पून्हा असा कारभार केला आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी जी-२० च्या काळात बीड बायपास संग्रामनगर उड्डाणपुल ते देवानगरी रेल्वेरूळ आणि भुयारीमार्गाकडून शहानुरमिया दर्गाकडे जाणारा पुलाखालचा महानगरपालिका हद्दीतील जोडरस्ता जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांच्या तगाद्याने जागतीक बँक प्रकल्प शाखेने दुरूस्त केला होता. कारण याच जागतीक बॅक प्रकल्प शाखेतील कारभाऱ्यांच्या चुकीच्या ड्राईंगने संग्रामनगर चौकातील पुलाची कमी झालेली उंची जुळवण्यासाठी उड्डाणपुलाखाली खोलगट अंडरपास केला गेला. अंडरपासची लेव्हल जुळवण्यासाठी देवानगरी उड्डाणपुलाखालचे रस्ते खोदण्यात आले होते.कसेबसे दुरूस्त करून सहा महिन्याचा काळ लोटला. मात्र आता रस्त्याच्या मधोमध असलेली महानगरपालिकेची कमलनयन बजाज हाॅस्पीटल ते संग्रामनगर चौकाकडून सिडकोकडे जाणारी जुनी बाराशे एम.एम.व्यासाची एक्सप्रेस जलवाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी थेट कमलनयन बजाज हाॅस्पीटल ते संग्रामनगर चौक ते सुतगिरणी चौकापर्यंत खोदकाम केले जात आहे. या कामाची जबाबदारी बीड बायपासचे काम करणार्या जीएनआय कन्स्ट्रक्शन कंपनीलाच दिले आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने जुन्या शहरासह सिडको - हडकोत तीन दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा यासाठी १९३ कोटीतून जुनी जलवाहिनी काढून त्याजागी जास्त व्यासाची मोठी जलनाहिनी टाकण्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. हीच बाब लक्षात घेऊन रस्त्याचे नूतनीकरण करण्यापूर्वी अथवा शिवाजीनगर रेल्वेगेट बंद करण्यापूर्वी का जलवाहिनी स्थलांतराचे काम महानगरपालिकेकडून करण्यात आले नाही, रस्त्याचे नुतनीकरण केल्यानंतर जलवाहिनी स्थलांतरीत करण्यासाठी रस्ता का खोदण्यात आला आहे. यामुळे त्या रस्त्यांच्या नूतनीकरणाच्या कामावर जनतेच्या खिशातील झालेला कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेला आहे.
संग्रामनगरचौक ते सुतगिरणीचौक मार्गावर कोंडी वाढली...
अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाचे काम नुक्तेच सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी. रेल्वे प्रशासन आणि जागतीक बँक प्रकल्प शाखेच्या पत्रावरून शहर वाहतूक पोलिसांनी भुयारी रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२३ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान शिवाजीनगर चौक, रेल्वे गेट मार्गे देवळाई चौकापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. असे असताना आता या भागातील सव्वा ते दीडलाख लोकांना एकमेव महत्वाचा बीड बायपास संग्रामनगर चौक ते देवानगरी मार्गे एकता चौक शहानुरवाडीकडे जाणारा पुलाखालचा जोड रस्ताच खोदण्यात आल्याने उड्डाणपुलावर न भुतो न भविष्यती वाहतूक कोंडी होत आहे. यात चाकरमाने, कामगार, विद्यार्थी व आजारी रूग्ण तसेच प्रतापगडनगर स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी जाणार्यांचे हाल होत आहेत.ऐन दिवाळीसारखा मोठा सण काही दिवसांवर आलेला असताना संबंधित विभागातील नियोजनशुन्य कारभार्यांनी सातारा - देवळाई व बीड बायपासकरांची कोंडी केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. सणासुदीच्या काळात मोठ्या अपघाताची दाट शंक्यता निर्माण झाल्याने या भागात संतापाची लाट पसरली आहे.विशेष म्हणजे रस्ता खोदताना सुरक्षा साधनात देखील ठेकेदाराकडून कंजुषी केली जात असल्याने रस्ता खचून रात्री अपरात्री अपघाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे.