Parbhani: परभणी जिल्ह्यासाठी सरकारने काय दिली गुड न्यूज?
मुंबई (Mumbai): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले असून, सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (सीआयआयआयटी) प्रकल्पाला आता प्रत्यक्ष स्वरूप मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ११५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
या अत्याधुनिक सीआयआयआयटी केंद्रातून दरवर्षी ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगातील प्रगत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे परभणी जिल्हा कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळकपणे झळकणार असून येथील तरुणांची रोजगारक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना शहरांकडे स्थलांतर न करता आपल्या जिल्ह्यातच उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योगसंधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यासाठी पाठपुरावा केला.
आयटी आणि स्टार्टअप क्षेत्राचे नवे केंद्र म्हणून परभणीची ओळख निर्माण करण्यासाठी बोर्डीकर यांचे प्रयत्न आहेत. सेलू परिसरात सॉफ्टवेअर कंपन्यांना आमंत्रित करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातूनच आयटी क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग खुला होणार आहे. तरुणांनी “नोकरी शोधणारे” न राहता “नोकरी निर्माण करणारे” व्हावे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन अंतर्गत नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन, मेंटॉरशिप आणि गरजेचे पाठबळ उपलब्ध करून देणारे उपक्रम राबवले जात आहेत.
मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामीण महिला बचत गटांना जोडून ‘लखपती दीदी’ संकल्पनेनुसार कौशल्य प्रशिक्षण, लघुउद्योगांसाठी मार्गदर्शन तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
पाणी, शेती, शिक्षण, आरोग्य अशा पारंपरिक विकास क्षेत्रांना कौशल्य, आयटी, स्टार्टअप आणि महिला उद्योजकता यांची सांगड घालून परभणीच्या दीर्घकालीन विकासाचा रोडमॅप मंत्री मेघना बोर्डीकर यांनी रेखाटला आहे.
या महत्त्वपूर्ण सीआयआयआयटी प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, रजिस्ट्रार वेणीकर तसेच परभणी अॅस्ट्रॉनोमिकल सोसायटी यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे.

