औरंगाबाद (Aurangabad) : बीडबायपासवर अंधारात मातीच्या ढिगाऱ्यावर वाहन स्लीप झाल्याने एका २२ वर्षाच्या युवकाचा दुभाजकाला धडकून आपला जीव गमवावा लागला. मातीच्या ढिगाऱ्यानजीकच जोड रस्त्याचे अर्धवट काम तेथे सावधानतेचा फलक, रेडियम पट्टे नसल्यानेच आणि प्रकाशाची सोय नसल्याने ही दुर्घटना घडली. या जीवघेण्या घटनेनंतर देखील कंत्राटदार सावधानता बाळगायला तयार नाही. यावरून अजून किती बळी घेणार बीडबायपास राष्ट्रीय महामार्ग असे 'टेंडरनामा' पाहणीत पुन्हा एकदा समोर आले आहे.
आधी स्मिता पठारे नावाच्या महिलेला देखील रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे अपघात झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले. विशेष म्हणजे याच मार्गावर छोट्या पूलाच्या अर्धवट कामामुळे रस्त्यालगत खड्ड्यात एक कार कोसळल्याने कारचे मोठे नुकसान झाले. एकामागून एक घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
विरोधीपक्षनेत्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
बीड बायपास येथील सदोष उड्डाणपुलाची पाहणी करण्यासाठी आलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवें यांना सातारा-देवळाईतील जनसेवा नागरी कृती समिती, संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी रस्त्यावर काम चालू असल्याच्या ठिकाणी व जिथे अर्धवट काम असेल त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारे सूचनाफलक न लावल्याने अपघात होत आहेत, एकाचा बळी गेला त्याचे काय, असा सवाल केला होता.
दरम्यान, दानवे यांनी निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? अशी विचारणा करत कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना यापुढे अशा घटनेला जबाबदार असणार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, यासाठी अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले. तथापी दानवेच्या सूचनांतर देखील कंत्राटदार आणि अधिकारी धोकादायक ठिकाणी सूचनाफलक लावण्यास तयार नसल्याचे 'टेंडरनामा'च्या पाहणीत समोर आले आहे.