छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : बीड बायपास देवळाई चौक ते वाणी मंगल कार्यालयादरम्यान शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथील नागरिकांना दक्षिण-उत्तर परिसरात जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू आहे. पण आधी चुकीचे डिझाईन, तसेच येथील जमिनीच्या खालील भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता हे भुयारी मार्ग बांधण्याचे काम सुरू केले आहे, त्यात भुयारी मार्गाची उंची साडेतीन मीटरच ठेवली जाणार असल्याने या मार्गातून जड वाहने कशी जातील, परिणामी संग्रामनगर पुलावर कोंडी कायम राहील असे नागरिकांकडून सांगितले जात आहे. त्याबद्दल सातारा - देवळाईकरांनी रेल्वे प्रशासनाकडे देखील तक्रार केली आहे.
शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक-५५ येथे दिवसभरातून रेल्वेच्या ४० ते ४५ फेऱ्या होतात. दरम्यान गेट बंद होताच मोठ्या कोंडीने प्रवाशांचे हाल होत होते. दरम्यान याच कोंडीमुळे अनेकांचे बळी देखील गेले होते. त्यामुळे येथे भुयारी मार्ग असावा अशी सातारा-देवळाईकरांची जुनीच मागणी होती. यामुळे रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन भुयारी मार्गाचे काम काढले. मात्र येथे बांधकामासाठी खोदकाम केल्यानंतर मलनिःसारण वाहिनी, खाजगी केबल कंपन्यांच्या केबल, महावितरणची केबल याचा मोठा अडथळा आल्याने काम लांबणीवर पडले. त्यानंतर कंत्राटदार जी. एन. आय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत रेल्वेगेट ते वाणी मंगल कार्यालयापर्यंत २० ते २५ फुटांपर्यंत खोल खड्डा तयार करण्यात आला. खोदकामामुळे दक्षिण-उत्तर जाण्यासाठी लोकांना पाच फुटाचा पर्याय उरला. मात्र येथेही महावितरण कंपनीची केबल आणि महानगरपालिकेची मलनिःसारण वाहिनीचा अडथळा आल्याने कंत्राटदाराने काम थांबवले. एकीकडे चिंचोळा रस्ता आणि शेजारीच मोठा खड्डा असल्याने स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका व महावितरण कंपनीला तातडीने कामे करण्याबाबत ड्रेनेज विभागातील अधिकाऱ्यांना फोनवर कल्पना देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
प्राप्त तक्रारीनुसार टेंडरनामा प्रतिनिधीने मंगळवारी भुयारी मार्ग कामाचा स्पाॅट पंचनामा केला असता प्रवाशांसह आसपासच्या शेकडो रहिवाशांनी आधिकाऱ्यांबद्दल तसेच कंत्राटदारांबद्दल नाराजी बोलून दाखवली व तीव्र संताप व्यक्त केला. नागरिकांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना सांगून देखील दखल घेतली जात नसल्याचे सांगत मलनिःसारण वाहिनी आणि केबल शिफ्टींगचे कामासाठी कंत्राटदाराने खड्डयालगतचे पत्रे काढल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवत रहिवाशांनी सातत्याने अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र कुणीही दखल घेतली नाही. अनेक दिवसांपासून कंत्राटदाराने पत्रे काढून ठेवली आहेत. खड्डयाच्या पाच फुटावरच बाजारपेठ आहे. महावितरण कंपनीने केबल उकरून काढल्याने आहे , त्या पाच फुटाच्या कच्च्या रस्त्यावर देखील खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. सातत्याने पादचाऱ्यांची गर्दी होत असल्याने रस्ताच शिल्लक राहत नसल्याने कोंडी होते. दरम्यान खड्ड्यात पडण्याची भिती पादचाऱ्यांना वाटत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन काम करायला हवे. यात केलेल्या खोदकामालगत कंत्राटदाराने वाणी मंगल कार्यालय ते शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंग गेटपर्यंत रस्त्यावर रहदारी असल्याने त्या ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिकेड्स लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पदावरून पादचाऱ्यांना चालणे देखील मुश्कील झाले आहे. खड्डा खोदून काढलेला राडारोडा तसाच रस्त्यावर पडून आहे.