
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत दरवर्षी येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यात येणार आहे. त्यातून उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याला ३० टीएमसी पाणी उपलब्ध होईल. जागतिक बँकेच्या मदतीने होत असलेल्या या प्रकल्पाच्या निविदा पुढील महिन्यात निघणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲंड अॅग्रिकल्चर’तर्फे ‘उद्योग पुरस्कार २०२५’ चे वितरण रविवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘‘मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर सरकार काम करीत आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासन राबविणार आहे. विविध प्रकल्पांद्वारे ५० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणले जाईल. या कामाचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम काही दिवस चालेल. या माध्यमातून आगामी काळात संपूर्ण मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत पुराचे ३० टीएमसी पाणी उजनी धरणाच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळविण्याची योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. मे महिन्यात या कामांच्या निविदा निघणार आहेत. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराची स्थिती निर्माण झाल्यास तब्बल १७० टीएमसी पुराचे पाणी असते. सामान्य स्थितीत ७० टीएमसी पुराचे पाणी असते. त्यातील ३० टीएमसी पाणी मराठवाड्याला उपलब्ध होऊ शकते.’’
जायकवाडी धरणावर सौरऊर्जा प्रकल्प
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्मितीसाठीही विविध प्रकल्प आणले जात आहेत. त्यात प्रामुख्याने देशातील सर्वांत मोठा तरंगता सौर प्रकल्प जायकवाडी धरणावर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी काही परवानग्या मिळाल्या असून, पर्यावरणविषयक एका समितीनेही नुकतीच पाहणी केली आहे. उर्वरित परवानग्या मिळाल्यानंतर लगेचच काम सुरू होईल.’’
शक्तिपीठ महामार्ग ठरणार जीवन वाहिनी
नागपूरहून गोव्यापर्यंत प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून जाणार आहे. हा महामार्ग मराठवाड्यातील उद्योगांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे मराठवाड्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांना, तसेच उद्योगांना चालना मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.