Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Tendernama
टेंडर न्यूज

Vijay Wadettiwar : कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांवर 8 हजार कोटींची मेहेरनजर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कंत्राटी भरती रद्द केल्याचा कांगावा सरकारने केला. परंतु त्यानंतर या कंत्राटी कंपन्यांना मुदतवाढ देऊन सरकारने बेरोजगार तरूणांची फसवणूक केली आहे. सरकारने तरुणांची फसवणूक थांबवावी. तरुणांच्या भावनांशी खेळू नये, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला खडसावले आहे.

राज्यातील रूग्णालयाची कामे देखील सरकार बाह्य यंत्रणेकडून करणार आहे. या कोट्यवधी रूपयांच्या कामांना एकत्रित प्रशासकीय मान्यता देण्याचा पराक्रम सरकारने केला असून कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी सरकारने आता कार्यक्रमच सुरू केला असल्याचा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला आहे.

तसेच 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला सरकारने स्वच्छ धुवून पवित्र करून काम दिल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे हे सरकार कंपन्यांसाठी काम करणारे सरकार असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

'ब्रिस्क इंडिया' कंपनीला दिलेले कंत्राट आणि आरोग्य खात्याने सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी काढलेले वार्षिक ६३८ कोटींचे टेंडर हे दोन्ही विषय 'टेंडरनामा'ने उघडकीस आणले आहेत.

वडेट्टीवार म्हणाले, कंत्राटी भरती बंद केल्याचे शासनाने जाहीर केले. परंतु हे करत असताना राज्य शासनाने बेरोजगार तरूणांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सरकारने कंत्राटी भरती करणाऱ्या कंपन्यांना नऊ महिन्याची मुदतवाढ दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तरूणाईने या फसव्या सरकारवर विश्वास ठेवू नये. सरकारमधील काही नेत्यांचे लागेबांधे असल्याने हा निर्णय घेतला आहे. एकीकडे कंत्राटी भरती बंद केल्याचा कांगावा करायचा आणि दुसरीकडे या कंपन्यांना मुदतवाढ द्यायची. सरकारचे हे धोरण कंपन्या जगवण्याचे आहे. यातून मिळणारा पैसा कोणाच्या खात्यात जातो, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे.

वडेट्टीवार म्हणाले, नऊ महिन्याच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला सहाशे कोटी प्रत्येक कंपनीवर खर्च करण्यात येणार आहेत. सुमारे आठ हजार कोटी रूपये सरकारी तिजोरीतून या कंपन्यांवर खर्च होणार आहेत. यातील चार हजार कोटी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर खर्च होतील. उरलेले चार हजार कोटी सत्ताधारी आणि कंपन्यांच्या झोळीत जातील. सरकारने जर जीआर रद्द केला तर मग कंपन्यांना मुदतवाढ का दिली? तरुणांना फसवण्याचे काम का केले? या प्रश्नांचे उत्तर सरकारने द्यावे. सरकार या कंपन्यांना जगवण्याचे काम करत आहे. तरूणांना उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत आहे, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.

राज्यात अनेक रुग्णालये आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांच्या साफसफाईची कामे स्थानिकांना दिली जायची. परंतु सरकारने आता कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी ६३८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कंपन्यांशी सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे आहेत. राज्यातील सर्व रूग्णालयांच्या कामांना एकत्रित प्रशासकीय मान्यता देऊन सरकारने कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम केले आहे.

तसेच 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला सरकारने स्वच्छ धुवून पवित्र करून काम दिल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे हे सरकार कंपन्यांसाठी काम करणारे सरकार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

ईडीच्या कारवाईमुळे वादग्रस्त ठरलेल्या 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याचे काम दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 'ब्रिस्क इंडिया' कंपनीवर मनी लाँडरिंगचे आरोप केले होते. संबंधित मंत्र्यांच्या साखर कारखान्याच्या उभारणीत 'ब्रिस्क इंडिया' कंपनीने मनी लाँडरिंग केले, असा सोमय्या यांचा आरोप आहे. ईडीने कंपनीच्या संचालकांसह मंत्र्यांच्या निवासस्थानी छापे देखील मारले होते.

ईडीच्या कारवाईनंतर 'ब्रिस्क इंडिया' कंपनीला देण्यात आलेले ग्रामविकास विभागाचे १५०० कोटींचे टेंडर रद्द करण्यात आले होते. तसेच, कंत्राटी नोकर भरतीत पात्र ठरल्यानंतर सुद्धा या कंपनीला तत्कालीन सरकारने बाद केले होते.