police recruitment
police recruitment Tendernama
टेंडर न्यूज

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पोलिस भरतीसाठी आता आधी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यातील पोलिस दलातील ७ हजार २३१ शिपायांच्या रिक्त जागा भरण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून, पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. तसेच मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची असून यात पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलातील सशस्त्र पोलिस शिपाई (पुरुष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची असेल. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ किलोमीटर धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५ गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.

लेखी परीक्षेचे स्वरूप

शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयावर आधारित प्रश्न असतील. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी असतील.

नव्वद मिनिटांचा कालावधी

ही परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य असणार आहे. लेखी परिक्षेत ४० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. या पोलिस भरतीमधील लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून ‘ऑप्टिकल मार्क रेकग्निशन’ (ओएमआर) पद्धतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ

पोलिस महासंचालक यांनी प्रत्येक पोलिस घटकासाठी गठित केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखीमध्ये मिळविलेल्या गुणांचे एकत्रीकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करेल. या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलिस दलास होणार असून त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.