मुंबई (Mumbai): दहिसर टोल नाका तेथून पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते.
यास्तव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री आणि मीरा भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांनी परिस्थिती समजावून सांगितली. तसेच स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोलनाका पुढे हलवण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल, तो प्रस्ताव केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल, त्यामुळे या दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित करण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हा टोलनाका पुढे ढकलल्यामुळे दहिसर आणि मीरा भाईंदर वासियांना मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक नागरिकांची वाहतूक कोंडीतून आणि इंधनाच्या अपव्यय होण्यापासून मुक्तता होणार आहे.
बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई-विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आयआरबीचे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर उपस्थित होते.