मुंबई (Mumbai) : शहरांचे शिल्पकार अशी ओळख सांगणाऱ्या सिडकोने (CIDCO) आता नवी मुंबईला (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवून देण्याचा विडा उचलला आहे. महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) सहकार्याने सिडको नवी मुंबईत एका मोठ्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे. या प्रकल्पामुळे देशातील नव्या पिढीलाही आपली वेगळी ओळख मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Education Hub In Navi Mumbai)
महाराष्ट्र सरकारच्या मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, मुंबई आणि नवी मुंबईत जागतिक दर्जाच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. आज (ता. १४) ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित समारंभात पाच जागतिक स्तरावरील प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना त्यांच्या कॅम्पस स्थापनेसाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान करण्यात येणार आहेत.
अॅबर्डीन विद्यापीठ (University of Aberdeen), युनायटेड किंगडम
यॉर्क विद्यापीठ (University of York), युनायटेड किंगडम
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (University of Western Australia), ऑस्ट्रेलिया
इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Illinois Institute of Technology), अमेरिका
इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (Istituto Europeo di Design – IED), इटली
हा ऐतिहासिक समारंभ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सिडकोच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीमुळे भारतातील विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची गरज न पडता जागतिक दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ५ किलोमीटर परिसरात या प्रकल्पांतर्गत सर्वोच्च १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची शैक्षणिक हब ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे:
विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळेल.
विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना मिळेल.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील सहकार्य व संवाद वाढेल.
मुंबई आणि नवी मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळेल.
हा प्रकल्प महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला आणि भारताच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याला २०२९ पर्यंत गाठण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे रोजगाराच्या संधी, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.
जागतिक दर्जाचे शिक्षण: भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस भारतातच उपलब्ध.
सांस्कृतिक आदान-प्रदान: विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी आणि प्राध्यापक एकाच व्यासपीठावर.
आर्थिक योगदान: स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे ब्रँडिंग.