Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

नितीन गडकरी म्हणतात, आता सॅटेलाईटद्वारे होणार टोलवसुली!

टेंडरनामा ब्युरो

नवी दिल्ली (New Delhi) : देशवासीयांना अनावश्यक टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्याच्या पर्यायावर केंद्र सरकार वेगाने काम करते आहे. नजिकच्या काळात महामार्गांवर उपग्रहाद्वारेच परस्पर टोल वसुली आणि तीही त्या गाडीच्या मालकाच्या बॅंक खात्यातून व्हावी या धर्तीवरील एक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा विचार सुरू आहे आणि त्यामुळे भविष्यात फास्टॅगची गरज भासणार नाही, असे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज राज्यसभेत सांगितले. आगामी तीन वर्षांत म्हणजेच २०२४ संपण्याआधी भारतातील रस्त्यांचे पायाभूत सुविधा जाळे अमेरिकेचाही मुकाबला करेल,अशी घोषणा गडकरी यांनी केली.

सध्याचे टोल धोरण सदोष असल्याची कबुली देताना गडकरी यांनी, हे धोरण २०१४ पूर्वी यूपीए सरकारने आणले होते व तेव्हाचे रस्ते-महामार्ग मंत्रीही तमिळनाडूचेच होते, असे अण्णाद्रमुकचे थंबीदुराई यांच्याकडे पहात मिश्कीलपणे सांगितले. ते म्हणाले की शहरातील लोक १० किलोमीटर रस्त्याचा वापर करतात पण त्यांना ७५ किमीसाठीचा टोल भरावा लागतो. हे चुकीचे असून टोलपासून नागरिकांना मुक्तता मिळविण्यासाठी तीन अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालींची चाचणी सुरू आहे. यातील एका प्रणालीची निवड नजीकच्या काळात केली जाईल. नव्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी एक विधेयक आणले जाईल. यात थेट उपग्रहीय तंत्रज्ञानाचाच वापर होणार असल्याने फास्टॅगचीही गरज भविष्यात राहणार नाही. या तंत्रज्ञानात टोल चुकवू शकणार नाही व त्यातून कोणी वाचणारही नाही. त्यातूनही पळवाटा काढणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी नव्या विधेयकात तरतूद असेल, हेही गडकरींनी नमूद केले.

पक्ष न पाहता झटक्यात रस्ता मंजूर!

२०२४ पर्यंत देशात मी २६ ग्रीन एक्प्रेस हायवे बनवणार म्हणजे बनवणारच. माझ्याकडे पैशाची बिलकूल कमतरता नाही, असे सांगताना गडकरी यांनी, दिल्ली-मुंबई, दिल्ली-जयपूर, दिल्ली-चंडीगड, लखनौ-कानपूर, चेन्नई-बंगळूर आदी शहरातील रस्तेप्रवास किती लक्षणीय कमी होईल हे धडाधड सांगताच खासदार अवाक झाले.

भारतातील टोल नाका पद्धतीचे (ठाणे-भिवंडी बीओटी रस्ता) ‘जनक' आपणच आहोत, असे कबूल करणाऱ्या गडकरींनाही टोलची टोळधाड असह्य वाटू लागल्याचे हे द्योतक असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा सदस्यांत उमटली.

माझ्याकडे कोणत्याही पक्षाचा खासदार येवो, मी त्याचा रस्ता झटक्यात मंजूर करतो व २०२४ पूर्वी भारतातील रस्त्यांचे जाळे कधी नव्हे इतके मजबूत होईल हे मी ‘संसदेत ऑन रेकॉर्ड सांगत आहे,असेही त्यांनी सांगितले. आपल्या धडाकेबाज कामाचे वर्णन करताना विसरलेले पुढील वाक्य त्यांनी नंतर आवर्जून वापरताच खसखस पिकली, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली..!’