Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal Corporation Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई: 20 वर्षे अडकलेला प्रकल्प 26 हजार कोटीत करण्यास ठेकेदार तयार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : तब्बल २० वर्षे अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेल्या मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) 29,653 हजार कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे टेंडर अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आता हा प्रकल्प महापालिकेच्या अंदाजित रक्कमेपेक्षा कमी म्हणजे सुमारे 25,963 कोटींमध्ये होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तब्बल चार वेळा या प्रकल्पाचे टेंडर रद्द करण्याची नामुष्की बीएमसीवर ओढवली होती. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच हा प्रकल्प कंत्राटाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. मुंबई महापालिकाने २००२ मध्ये पहिल्यांदा या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे नियोजन केले होते.

मुंबई सांडपाणी विल्हेवाट प्रकल्प-दोन (MSDP-II) अंतर्गत दररोज 2,464 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता अपेक्षित आहे. याअंतर्गत वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडुप असे सात एसटीपी प्रकल्प उभे राहणार आहेत. कंत्राटदार आपआपसात संगनमत करुन जास्त बोली लावत असल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केला होता. त्यानंतर बीेएमसीने फेब्रुवारीमध्ये हे टेंडर रद्द केले होते. कंत्राटदारांनी सहा एसटीपींच्या बाबतीत बीएमसीच्या अंदाजापेक्षा 30% ते 70% जास्त रक्कमेची टेंडर भरली होती.

नव्याने राबवलेल्या टेंडर प्रक्रियेत बीएमसीने सर्व सात एसटीपीच्या बांधकाम आणि देखभालीसाठी सुधारित अंदाजित खर्च रु. 29,653 कोटी निश्चित केला होता, परंतु कंत्राटदारांनी 25,963.32 कोटींमध्ये प्रकल्प राबविण्यास सहमती दाखवली आहे. यावेळी बीएमसीने सर्व सात एसटीपीसाठी टेंडर मागवली होती. त्यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये, बीएमसीने सहा एसटीपी (मालाड वगळून) उभारण्यासाठी टेंडर काढले होते. या सहा एसटीपीच्या सुधारित अंदाजित किंमतीत गेल्या 20 महिन्यांत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यावेळेस, या सहा एसटीपींची किंमत 16,412 कोटी रुपये इतकी होती.

वरळीसाठी, सर्वात कमी बोली लावणाऱ्या सुएझ इंडिया आणि सुएझ इंटरनॅशनल (जॉइंट व्हेंचर), यांनी 5,811.70 कोटी रुपये (अंदाजाच्या 0.35 टक्के जास्त) टेंडर भरले आहे; वर्सोव्यासाठी, डीआरएन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने रु. 2,138.23 कोटी (अंदाजापेक्षा 24.99 टक्के कमी); घाटकोपरसाठी, जीव्हीपीआर इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडने रु. 3,681.94 कोटी (अंदाजाच्या 30.72 टक्के कमी); वांद्रेसाठी, एल अँड टी लिमिटेडने रु. 4,293.34 कोटी (अंदाजाच्या 2.88 टक्के कमी); मालाडसाठी, एनसीसी लिमिटेडने 6,370.34 कोटी रुपये (अंदाजाच्या 0.54 टक्के कमी); धारावीसाठी, वेलस्पन-ईडीएसी जेव्हीने 4,634 कोटी रुपये (अंदाजाच्या 0.04 टक्के कमी) आणि वांद्रे एसटीपीसाठी, जेडब्ल्यूआयएल-ओएमआयएल-एसपीएमएल यांनी संयुक्तपणे रु. 1,170 कोटी (अंदाजाच्या 53.88 टक्के कमी) रक्कमेचे टेंडर भरले आहे.

बीएमसीतील खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, आयआयटी-मुंबई आणि व्हीजेटीआयचे तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्या समितीशी सल्ला मसलत करुन प्रकल्पाचे नव्याने अंदाजित बजेट निश्चित केले आहे. सातही एसटीपींचे बांधकाम आव्हानात्मक आहे. जमिनीची अडचण आहे, तांत्रिक अडचणी आहेत तसेच अंमलबजावणीचा सुद्धा धोका आदी समस्या आहेत. त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचा दावा बीएमसीकडून केला जात आहे. सुप्रीम कोर्टाने प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडल्यामुळे किनारपट्टीवरील प्रदूषणाच्या याचिकेवर सुनावणी करताना 1 फेब्रुवारी रोजी बीएमसीला फटकारले होते. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त करत हे कंत्राट अंतिम झाल्यानंतर अहवाल सादर करण्याचे निर्देशही बीएमसीला दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व तपशील सादर केले जातील असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले. एकदा कंत्राटदार निश्चित झाले की, काम पूर्ण होण्यासाठी ४ ते ६ वर्षे लागतील. डिझाईन आणि बांधकामाव्यतिरिक्त, पुढील 15 वर्षांसाठी एसटीपीच्या ऑपरेशन आणि देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे, अशी माहिती बीएमसीतील उच्चपदस्थांनी दिली.