Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai: गडकरींकडून घोषणांचा पाऊस! 15000 कोटीच्या प्रकल्पांची घोषणा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ (Mumbai - Goa NH-66) हा कोकणातील प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा मार्ग असल्याने औद्योगिक विकासालाही चालना मिळेल. तसेच कृषी, फलोत्पादन वाहतूक सुलभ होऊन व्यवसायाला चालना मिळेल. सुधारित रस्ता सुरक्षा प्रणालीमुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. हे प्रकल्प जिल्ह्याच्या, राज्याच्याच नाही तर देशाच्या व्यापारवृद्धीत व सर्वसमावेशक प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज केले.

पळस्पे (रायगड) येथे ४१४.६८ कोटी रुपये किंमतीच्या व ६३.९०० किमी लांबीच्या ३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आदी उपस्थितीत होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडकरी यांनी १५ हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली. यामध्ये कळंबोली जंक्शन हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प, पागोडे जंक्शन चौक ते ग्रीनफील्ड महामार्ग हा १२०० कोटी रुपयांचा प्रकल्प आणि मोर्बे – करंजाडे हा जेएनपीटीवरून जाणारा १३,००० कोटी रुपयांचा दिल्लीला जोडणारा महामार्ग यांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल, अशी घोषणा गडकरी यांनी केली.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्याला लाभलेल्या जेएनपीटी व दिघी या दोन समुद्री बंदरांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान आहे. हे प्रकल्प स्थानिक तसेच राष्ट्रीय विकासात भरीव योगदान देत आहेत. समुद्री व्यापार, पर्यटन व औद्योगिक क्षेत्राची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती आणि ही प्रगती साध्य होऊ शकते ते मजबूत रस्त्यांच्या जोडणीतून. पनवेल ते कासू या महामार्गाच्या काँक्रिटीकरणामुळे प्रवास गतीमान होईल तसेच वेळेची व इंधनाची बचत होईल. वाहन चालवण्याच्या व देखभालीच्या खर्चात कपात होईल. जेएनपीटी व दिघी या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा हा मार्ग असल्याने यामुळे जल वाहतूक विकासाला चालना मिळेल.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाची हवाई पाहणी सुद्धा केली. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत मुंबई-गोवा महामार्गाची इंदापूर ते झारप या भागांतील १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या १० पॅकेजेसची एकूण सुधारित किंमत १५,५६६ कोटी रुपये असून ३५६ किमी लांबीच्या महामार्गावरील २५० किमी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाची एकूण १० पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन पॅकेजेसचे (P-9, P-10) जवळपास ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ पॅकेजेस असून यापैकी २ पॅकेजेसचे (P-4, P-8) अनुक्रमे ९२ टक्के व ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.

दोन पॅकेजेससाठी (P-6, P-7) नवीन कंत्राटदाराची नेमणूक करून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. रायगड जिल्ह्यातील तीन पॅकेजेसपैकी दोन पॅकेजेसचे (P-2, P-3) अनुक्रमे ९३ टक्के व ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पॅकेजचे (P-1) निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल.

भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजूरीस झालेला विलंब यामुळे हे काम वेळेत पूर्ण होवू शकले नाही, परंतु सर्व अडचणींवर मात करून हे काम आता प्रगतीपथावर आहे.