Aditya Thackeray, EKnath Shinde, Devendra Fadnavis
Aditya Thackeray, EKnath Shinde, Devendra Fadnavis Tendernama
टेंडर न्यूज

Mumbai : आदित्य ठाकरेंच्या 'या' ड्रीम प्रोजेक्टला रेड सिग्नल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट माहीम वांद्रे वॉकवे सायकल ट्रॅक रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०८ कोटींचा प्रकल्प रद्द करत मुंबईकरांवर ओझे ठरणारा भ्रष्टाचारी कंत्राटदार रोखल्याची प्रतिक्रिया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच या सायकल ट्रॅकच्या प्रकल्पाला सुरूवात झाली होती. युनिक कंस्ट्रक्शन व स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या जॉईंट व्हेंचरला हे कंत्राट देण्यात आले होते. ३.६ किमीच्या वॉकवे कम सायकल ट्रॅकसाठी ४४.६५ कोटी रूपये प्रति किमी या दराने पैसे मोजण्यात येणार होते. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी प्रति किलोमीटर येणाऱ्या खर्चापेक्षा हा खर्च ५०० पटीने अधिक होता. एकूण ट्रॅकची रूंदी ६ मीटर होती. त्यापैकी २.५ मीटरचा वापर सायकल ट्रॅकसाठी करण्यात येणार होता.

मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या आपीएस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीच्या प्रमोटरच्या पत्नीच्या नावे स्पेको ही उपकंपनी काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेत २०१६ मध्ये १४२ कोटी रूपयांचा घोटाळा या कंपनीने केला आहे. २०१९ साली सीएसटी येथील हिमालय ब्रीज दुर्घटनेत ६ मुंबईकरांचा बळी घेतलेली ही कंपनी असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.

माहीम वांद्रे वॉकवे सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या निमित्ताने शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. हा अतिशय महागडा आणि खर्चिक प्रकल्प असल्याने या प्रकल्पातील पैसा वाया जाणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिले होते. स्थानिक विरोधानंतरही या प्रकल्पाचे काम देण्यात आले होते. तसेच पर्यावरणीय धोकेही या प्रकल्पामुळे समोर आले होते. सोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा तसेच सी लिंकच्या सुरक्षेचा प्रश्नही यानिमित्ताने ऐरणीवर आला असता. त्यामुळे अशा भ्रष्ट कंत्राटदाराला या प्रकल्पाचे काम देऊ नये अशी मागणी केल्याचेही शेलार यांनी सांगितले.

याआधी आशिष शेलार यांनी या सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहिले होते. हा संपूर्ण प्रकल्प अतिशय वाईट पद्धतीने नियोजित करण्यात आला होता. अतिशय घाईत या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यावेळी नागरिकांना विश्वासात न घेता या प्रकल्पाला सुरूवात झाली. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येणार असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला होता.