Narendra Modi (File)
Narendra Modi (File) Tendernama
टेंडर न्यूज

ठरलं तर! पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' दिवशी 'समृद्धी'चे लोकार्पण

टेंडरनामा ब्युरो

.मुंबई (Mumbai) : मुंबई - नागपूर (Mumbai - Nagpur) या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) पहिल्या टप्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नागपुरात येत्या 11 डिसेंबर रोजी लोकार्पण सोहळा पार पडणार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी नागपूरच्या विस्तारीत मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार असून, राज्य सरकारकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 11 डिसेंबरची तारीख मिळाली आहे. त्याप्रमाणे लोकार्पणानंतर नागपूर - शिर्डी पहिला टप्पा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्गाद्वारे जोडले जात आहे. नागपूर-मुंबई दरम्यानची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने 31 जुलै 2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असला तरी, एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. हा प्रकल्प सुमारे 55 हजार कोटींचा असून, डोंगरदऱ्यांमधून महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामूळे नागपूर ते मुंबई पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार असून, 701 किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग असणार आहे. त्यापैकी नागपूर - शिर्डी या पहिल्या टप्याचे आता काम पूर्ण झाले असून, 520 किलोमीटरचा प्रवासाचा समृद्धी महामार्ग 11 डिसेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाचे तीन भाग करण्यात आले आहेत. भाग १ मध्ये शिर्डी ते नागपूर दरम्यानचा ५२० किमीचा रस्ता खुला केला जाणार आहे. भाग २ मध्ये इगतपुरी आणि नागपूर दरम्यानचा ६२३ किमीचा महामार्ग वाहतुकीच्या कक्षेत आणणारा अतिरिक्त १०३ किलोमीटरचा रस्ता खुला केला जाईल आणि भाग ३ मध्ये, संपूर्ण ७०१ किमीचा रस्ता २०२३ पर्यंत वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विविध कंत्राटदारांचा समावेश असलेल्या १६ पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी वर्धा येथे पॅकेज २ आणि इगतपुरी येथे पॅकेज १४ हे दोन पॅकेज रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण झाले. पॅकेज २ मध्ये, भारतातील सर्वात मोठा वन्यजीव ओव्हरपास बांधण्यात आला. त्यात दोन वन्यजीव ओव्हरपास आणि अंडरपास बांधण्याचा समावेश होता. 

समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात वन्यजीव संरक्षणासाठी एकूण 80 बांधकामे प्रस्तावित केली आहेत. त्याची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणी ध्वनीरोधक ठिकाण तयार केले आहे. तर आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी केली असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले आहे.
प्रकल्पाच्या बांधकामामध्ये येणारी 2 लाख 36 हजार झाडे बाधीत होत असल्याने समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा 11 लाख 31 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीत झाडे लावणे, सुशोभीकरण करणे, सिंचन व्यवस्था करणे त्याशिवाय वृक्ष लागवडीची 5 वर्षे देखभाल दुरूस्ती करण्याचे काम सुद्धा केले जाणार आहे.

असा आहे महामार्ग
- लांबी 701 किलोमीटर
- खर्च - 55 हजार 335 कोटी
- मार्गिका - 3 अधिक 3
- वाहन वेगमर्यादा - 150 किमी प्रतितास (डोंगराळ भागात 120 किमी)
- पहिला टप्पा - 520 किलोमीटर 
- रस्त्यांची रुंदी - 120 मीटर (डोंगराळ भागात 90 मी)
- इंटरचेंज - 24
- रस्तालगतची नवनगरे - 18
- मोठे पूल - 33
- लहान पूल - 274
- बोगदे - 6
- रेल्वे ओव्हर ब्रिज - 8
- फ्लाय ओव्हर - 65
- कल्व्हर्ट - 672

- मार्गक्रमण - 10 जिल्हे, 26 तालुके, 292 गावे