Mumbai
Mumbai Tendernama
टेंडर न्यूज

माहुल पंपिंग स्टेशनच्या तिढा १५ दिवसांत सुटणार; फडणवीसांचे आश्वासन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : माहूल पंपिंग स्टेशनसाठी मुंबई महानगर पालिकेने खासगी विकसकाबरोबर भूखंडाची अदलाबदल केल्याच्या निर्णयावरुन भाजपने मोठा आरोप केला होता. या भूखंड अदलाबदलीत 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर विकासकाला दिलेल्या जागेचा समावेश केंद्राने 'सीआरझेड'मध्ये करुन महापालिकेच्या प्रयत्नांना ब्रेक लावला होता.

राज्यात सत्तांतर होताच खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या पंधरा दिवसात केंद्र सरकारकडून जागेसाठी परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन महापालिकेला दिले आहे. माहूल पंपिंग स्टेशनसाठी मुंबई महापालिकेला सहा एकर जमीन गरजेची आहे. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या कक्षात येऊन शहरातील परिस्थितीचा पाहणी केली. यावेळी मुंबईत महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. मुंबई पूरस्थितीवर बोलताना आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माहुल पंपिंग स्टेशनसाठी मिठागराच्या जागेसाठीची गरज बोलून दाखवली. या जागेची उपलब्धतता झाल्यास पूर्व उपनगरात चुनाभट्टी, सायन, गांधी मार्केट, अँटॉप हिल या परिसरातील पूरस्थितीची समस्या कायमची मिटून जाईल. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही चहल यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही या विषयाला कायमस्वरूपी सोडवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांना दिले.

मुंबई महापालिकेला सहा एकर जमीन गरजेची आहे. या जागेची मालकी ही मिठागर विभागाकडे म्हणजे केंद्राकडे आहे. त्यासाठीच वाणिज्य सचिवांना पत्र लिहून ही बाब कळवली आहे. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीही या परवानगीसाठी होकार दिला आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसात ही परवानगी मिळवण्याचेही त्यांनी सांगितल्याचे चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. सध्या ठराविक पाण्याची पातळी गाठल्याशिवाय पंपाचे काम सुरू होऊ शकत नाही. तसेच पंपदेखील कायमस्वरूपी चालू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच मिठागर विभागाची जागा उपलब्ध झाल्यास त्याठिकाणी पंपिंग स्टेशन उभारणी करून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात करणे शक्य होईल, असेही चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मुंबई पूर्व उपनगरात माहुल पंपिंग स्टेशनचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासोबतच मोगरा पंपिंग स्टेशनचा वाददेखील कायदेशीर लढाईत आहे. पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी भरतीच्या वेळेत जेव्हा समुद्राचे पाणी फ्लड गेट्स लावून बंद केले जाते, तेव्हा शहरातून समुद्राच्या दिशेने जाणारे पाणी उपसा करून समुद्रात फेकण्याचे काम पंपिंग स्टेशनमधून चालते. मुंबईत पूर्व उपनगरात सध्या सखल भाग असलेल्या सायन गांधी मार्केट, चुनाभट्टी यासारख्या भागांना माहुल पपिंग स्टेशनच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळू शकेल.