Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
Devendra Fadnavis, Uddhav Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई पालिकेभोवती चौकशीचा फास, कॅगकडून विशेष ऑडिट होणार; शिवसेना..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) भ्रष्टाचाराच्या आरोपांचे महालेखा परीक्षक अर्थात कॅगकडून विशेष ऑडिट करण्यात येईल. याशिवाय काही आरोपांची नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीचा फार्स न करता आरोपांची चौकशी कालबद्ध वेळेत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केली.

मुंबई महापलिकेतून शिवसेनेला होणारी आर्थिक रसद बंद करण्याचा विडा भाजपने उचलला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करून आपला झेंडा फडकाविण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या मुंबईच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा डाव टाकला आहे. फडणवीस यांनी आपल्या उत्तरात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या कोणत्या प्रकरणांची चौकशी सुरु आहे याची यादीच वाचून दाखवली.

कोरोना केंद्रात गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या काळात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच रातोरात कंपन्या उघडून कंत्राटे घेतली. या आरोपांची अनेक महिने चौकशी सुरु आहे. हे आता चालणार नाही. सरकारला चौकशीचा फार्स करता येणार नाही. त्यामुळे नगरविकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कालबद्ध वेळेत चौकशी पूर्ण केली जाईल. महापालिकेने सर्वसामान्य जनतेचा पैसा वाईट पदधतीने वळविला आहे. त्यामुळे अशा आरोपांचे महालेखा परीक्षकांडून विशेष ऑडिट करण्यात येईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

मुंबईतील महापालिकेच्या रस्त्यांच्या कामासाठी स्थानिक कंत्राटदार पात्र ठरतो. मात्र, दर्जेदार काम करणारी एल अँड टी कंपनी पात्र ठरत नाही, असा टोला लगावताना फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्‍यारित १२०० किमीचे रस्‍ते पुढील तीन वर्षांत काँक्रिटचे होतील, अशी घोषणा केली. त्यातील ४०० किमीच्या रस्तांच्या कामाचे टेंडर निघाले आहे. २०० किमीचे लवकरच निघेल. पुढच्या वर्षी आणखीन ४०० किमीचे टेंडर निघेल. यातून महापालिकेतील खड्डयांचे अर्थकारण कायमचे बंद करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

भेंडी बाजार पुनर्विकास प्रकल्पाची चौकशी होणार
मुंबईतील महत्वाकांक्षी भेंडी बाजार प्रकल्पाचे सर्व आराखडे बदलण्यात आले. हे बदलताना पारंपारिक रस्ते बंद करून रस्त्यांची रुंदी कमी करण्यात आली. यातून अतिरिक्त जागा चटई क्षेत्र निर्देशांकाच्या(एफएसआय) रुपात विकासकांना देण्यात आली. राज्य सरकार खुल्या मनाने भेंडी बाजार पुनर्विकासाला मदत करत असताना एक भेंडी बाजार उचलून दुसरा भेंडी बाजार तयार केला जात असेल तर ते योग्य नाही. यातून लोकांचे जीवनमान उंचावणार नाही. त्यामुळे प्रकल्प आरखडा का बदलला आणि या भ्रष्टाचारामागे कोण आहे याची चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. ही चौकशी करताना प्रकल्पाचे काम थांबवू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.