Thane
Thane Tendernama
टेंडर न्यूज

केंद्रीय मंत्रीच म्हणतात, ठाणे जिल्ह्यात निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची चलती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्ह्यात रस्ते, खड्डे, कचरा किंवा विकासाचे प्रकल्प राबविणारे ठेकेदार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करतात. अशी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांची जिल्ह्यात चलती आहे. चांगल्या दर्जाचे काम करणारा ठेकेदार मिळत नाहीत त्याचमुळे जिल्ह्यात नागरी समस्या हा ज्वलंत विषय आहे, अशी टीका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे आयोजित स्वच्छता अभियानात केंद्रीय मंत्री पाटील कल्याणमधील कार्यक्रमात सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. पावसाळा आला की दरवर्षी ठरलेले खड्डे, पाणी तुंबणार, नजर जाईल तिथे कचऱ्याचे ढीग, ही कामे करणारा ठेकेदार चांगला असेल आणि त्याने चांगली कामे केली तर कोणतीही नागरी समस्या निर्माण होत नाही. परंतु, ठाणे जिल्ह्यात कोणतेही विकासाचे काम, प्रकल्प असो चांगल्या दर्जाचे काम करणारा ठेकेदार मिळत नाहीत. त्यामुळे नागरी समस्या हा ठाणे जिल्ह्यातील ज्वलंत विषय बनतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

परिसरात नागरी विकासाची कामे सुरू झाली की त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक दक्ष नागरिकांनी एक दबाव गट तयार केला पाहिजे. सुरू असलेली कामे दर्जेदार आहेत की नाहीत याची चाचपणी नागरिकांनी केली पाहिजे. अशा दबाव गटातून ठेकेदारावर अंकुश राहतो. कामे चांगल्या दर्जाची होतात, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत बकालपणा अजिबात सहन करणार नाही. याविषयी लवकरच एक बैठक घेऊन शहरातील नागरी समस्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना करणार आहे, असे ते म्हणाले.

केवळ स्वच्छता पंधरवड्यामध्ये स्वच्छता अभियान न राबविता ते दररोज राबविले पाहिजे. नागरिकांनी संघटितपणे गट करुन विभागवार महापालिकेला सहकार्य केले तर शहर स्वच्छ राहण्यास सहाय्य होईल. नागरिकांच्या सहभागातून महापालिका शहर स्वच्छतेमध्ये अग्रस्थानी येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मंत्री पाटील यांच्यासोबत या स्वच्छता अभियानात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त अतुल पाटील, माहिती विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माजी आमदार नरेंद्र पवार, शहरप्रमुख रवी पाटील, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, डाॅ. प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या डाॅ. रुपिंदर कौर सहभागी झाले होते.