IT Park
IT Park Tendernama
महाटेंडर

चिकलठाण्यातील IT पार्क का पडलाय ओसाड? जबाबदार कोण?

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या, पण ओसाड पडलेल्या आयटी पार्क संदर्भात 'टेंडरनामा'कडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रतिनिधीने सलग तीन दिवस चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील टी सेक्टर मधील ओसाड आयटी हबची पाहणी केली. दरम्यान येथील उद्योजकांशी बोलताना सरकारची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुढे आली.

ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ येथे आयटी क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मनुष्यबळ देखील मुबलक आहे. मात्र, सरकारची उदासीनता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याने येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. आयटी उद्योग केवळ मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहेत.

मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थांमधून सुमारे चाळीस हजारांहून अधिक विद्यार्थी संगणकशास्त्रासंबंधी शिक्षण घेऊन परदेशात अथवा इतर मेट्रो सिटीत नोकरी शोधतात. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक, बी. एस्सी., बीसीएस, बीसीए, एमसीए , बीटेक, एमटेकचा समावेश आहे. येथील औद्योगिक वसाहतीत अभ्यासक्रमाव्यतिरिक्‍त त्यांच्यापर्यंत नवे तंत्रज्ञान पोचण्याची व्यवस्था नाही.

परिणामी मोजके विद्यार्थी पदरचे पैसे खर्चून मेट्रो शहरात रोजगाराभिमुख शिक्षण घेऊन पुढे जातात. मात्र ज्यांची बेताची परिस्थिती आहे , असे विद्यार्थी शहरातच मिळेल त्या पगाराची नौकरी पत्करून समाधान मिळवतात.

पायाभूत सुविधांची वानवा

आयटी उद्योगाला चालना मिळण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची (रस्ते, विमान, बस आणि रेल्वे आदी) वानवा आहे. हैदराबाद, पुणे, चेन्नई आणि बंगळूर ही सर्व शहरे विमानांनी जोडलेली आहेत. त्याशिवाय आयटी उद्योगाला लागणाऱ्या पूरक सुविधा आणि प्रोत्साहन तेथील राज्य सरकारतर्फे दिले जाते. तुलनेत छत्रपती संभाजीनगरासह मराठवाड्यात नवा आयटी उद्योग येण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात नाहीत.

आयटी क्षेत्रातील नोकरवर्गाला चांगला पगार आणि ग्लॅमर निर्माण झाले आहे. या दोन्ही बाबींमुळे आयटी उद्योजक आणि नोकरवर्ग मेट्रो शहराला प्राधान्य देतात. त्या ठिकाणी मनोरंजन, पायाभूत सुविधा, मुलांसाठी दर्जेदार शैक्षणिक संस्था आदी उपलब्ध असतात. नाईट शिफ्टमध्ये काम करताना त्यांना ताणतणाव निवळण्यासाठी चोवीस तास हॉटेल्स, टॅक्‍सी आणि मनोरंजनासारख्या सुविधा हव्या असतात. त्यामुळे मराठवाड्यात शिकून विद्यार्थी नोकरीसाठी मेट्रो शहरातच जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.

● मराठवाड्यातील तरुणांमध्ये आयटी उद्योगासाठी लागणाऱ्या क्षमता प्रचंड आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांमार्फत सॉफ्ट स्कील आणि कम्युनिकेशन हे विषय शिकविले जात नाहीत. त्यामुळे त्यांना स्वत:ला त्याच क्षमतेने व्यक्‍त करता येत नाही. त्यातून स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होतो. या न्यूनगंडामुळे मराठवाड्यातील तरुणाई रोजगाराभिमुख संधी मिळविण्यास सक्षम होत नाही.

● २००२ ते २०१५-१६ दरम्यान येथे आयटी क्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्या लहान-मोठ्या मिळून पन्नासच्या आसपास कंपन्या होत्या. शंभर कोटीपेक्षा अधिक उलाढाली होत्या. मात्र सद्य: स्थितीत केवळ बोटावर मोजण्या इतक्याच कंपन्या शिल्लक आहेत. कारण येथील आयटी उद्योग वाढीसाठी कुठल्याही प्रकारचा अँकर अथवा मोठा प्रकल्प आणण्यासाठी ना सरकार प्रयत्न करते, ना येथील लोकप्रतिनिधी.

● या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन विप्रो, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या कंपन्या आणल्यास रोजगार व उद्योगनिर्मिती होऊ शकते. सध्या अस्तित्वात असलेल्या बोटावर मोजण्या ईतक्या कंपन्या स्थानिक पातळीवर मोबाईल ॲप्लिकेशन, वेबसाईट, वेब ॲप्लिकेशन, ईआरपी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, युटिलिटी आणि लिव्हींग ॲप आणि आर्किटेक्‍चर डिझाईन तयार करून देण्याचे काम करत आहेत. त्यांची वर्षाकाठी या कंपन्यांत केवळ वीस ते तीस कोटी रुपयांची उलाढाल होते.

● राज्य सरकारने मराठवाड्यातील आयटी उद्योग बहरण्यासाठी या ठिकाणी आयटीसाठी दिलेल्या भूखंडाच्या जागा मोकळ्या करून आयटीसाठीच आरक्षित भूखंड आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांच्याच ताब्यात दिल्यास व तेथे आयटी क्षेत्रच बंधनकारक केल्यास निश्‍चितच फायदा होऊ शकेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.