Accident
Accident Tendernama
विदर्भ

Yavatmal : आर्णी - यवतमाळ महामार्गावरील 'ते' वळण का बनलेय धोकादायक?

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : आर्णी - यवतमाळ मार्गावरील दत्तरामपूर वळणावर महामार्ग झाल्यापासून अपघाताची मालिका सुरू आहे. आजपर्यंत पन्नासहून अधिक लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र या वळणावर उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

दररोजच्या अपघातांमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये कमालीचा रोष वाढत आहे. अपघातात निष्पाप लोक जीव गमावत आहेत. यासाठी येथील कुणाल मनवर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत आहे. त्यामुळेच फलक लावणे, रेडीयम लावणे ही कामे होत आहे. मात्र, यातील गुंतागुंत सुटलेली नाही.

अपूर्ण 165 मीटर रोडचे काम पूर्ण झाल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. नाही तर निष्पाप लोकांचे बळी जातच राहणार आहे. हे थांबले पाहिजे, हे कुणालसह सर्वसामान्य लोकांना वाटत आहे.

दत्तरामपूर वळणाला लागून वस्ती आणि शेती आहे. त्यांचे काही मालक न्यायालयात गेले होते. त्यामुळे या भागातील 165 मीटर जागेचे भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण आहे. परिणामी यवतमाळकडून आर्णीकडे जाणारे वाहन दत्तरामपूरजवळ वळणावर आदळते, अपघात होतात. यात अनेकांना अपगंत्व येणे, जखमी होणे, मृत्यू होणे हे प्रकार सातत्याने घडत आहे.

या जागेवरून न्यायालयात वाद होता. त्याचा निकाल भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता पुढील कामाच्या टेंडरसाठी नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. टेंडर झाल्याबरोबर रखडलेले काम पूर्ण होईल, अशी माहिती राजमार्ग प्राधिकरणाचे यवतमाळचे प्रोजेक्ट डायरेक्टर ए. एम. मानकर यांनी दिली. 

टेंडर प्रक्रियेनंतर होणार काम सुरू

दत्तरामपूर वळणावर अपघाताची मालिका कुठेतरी थांबली पाहिजे, यासाठी कुणाल मनवर अनेक दिवसांपासून संबंधित विभागाकडे पत्र-व्यवहार करीत आहे. त्यामुळे वेळोवेळी थातूरमातूर उपाययोजना केल्या जातात. मात्र, ते पुरेसे नाही. आता दत्तरामपूर तथा हिवरासंगमजवळील रखडलेले काम होऊ शकते. कारण न्यायालयाने हायवेच्या बाजूने निकाल दिला. मात्र, कामाच्या टेंडर प्रक्रियेला वेग देऊन प्रत्यक्ष कामाला लवकर सुरवात करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे कुणाल मनवर यांनी सांगितले.