Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

100 वर्षे जुन्या BIT चाळींच्या पुनर्विकासाबाबत काय म्हणाले फडणवीस?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मुंबईतील बीआयटी चाळी १०० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. या चाळींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी मुंबई महानगरपालिकेकडे विकासकामार्फत प्रस्ताव पाठवित आहेत. यासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

बीआयटी चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात सदस्य सचिन अहिर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावेळी उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
मुंबईतील बी.आय.टी. चाळींची निर्मिती होऊन जवळपास १०० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे अशा चाळींचा पुनर्विकास हा विकास नियंत्रण नियमावली १९९१ अन्वये  करण्यात येत आहे. बीआयटी चाळीतील रहिवाशांमार्फत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून संस्थेमार्फत विकासकाची नेमणूक करण्यात येते. त्यानंतर विकासकामार्फत मुंबई महानगरपालिकेस पुनर्विकास प्रस्ताव सादर करण्यात येतो, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत २२ वसाहतींमध्ये १३३ बीआयटी इमारती आहेत, त्यापैकी ६१ इमारतींमध्ये महानगरपालिका भाडेकरूंच्या गृहनिर्माण संस्थांमार्फत नेमणूक केलेल्या विकसकांकडून पुनर्विकास प्रस्ताव महानगरपालिकेस प्राप्त झाले आहेत. या ६१ इमारतींपैकी १७ इमारतींचा पुनर्विकास झाला असून ४४ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित ७२ इमारतींचे रचनात्मक परीक्षण करून महानगरपालिकेमार्फत नियमितपणे दुरुस्ती करण्यात येते. सद्य:स्थितीत १२ इमारतींच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत सुरू असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत आमदार शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.