river
river Tendernama
विदर्भ

Nagpur : विदर्भ सुजलाम-सुफलाम करणारा नदीजोड प्रकल्प अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : विदर्भाला सुजलाम-सुफलाम करणारा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प हा प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. विदर्भातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून, लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

वैनगंगा नदीवरील वाहून जाणारे पा़णी या प्रकल्पामुळे विदर्भाला मिळणार आहे. 1772 दलघमी पाणी उपलब्ध होणार आहे. या नदीजोड योजनेतून सिंचनासाठी 1286 दलघमी पाणी राखीव ठेवले असून, यात घरगुती वापरासाठी 32 दलघमी पाणी असणार आहे. औद्योगिक वापरासाठी 397 दलघमी. वैनगंगेपासून-नळगंगेपर्यंत पाणी जात असताना वाहन अपव्यय म्हणून 57 दलघमींची तरतूद करण्यात आली आहे. 

वैनगंगा ते नळगंगा या नदीजोड योजनेचा कालवा 426.542 किलोमीटर असणार असून, हे पाणी या कालव्याद्वारे थेट बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगापर्यंत जाणार आहे. या कालव्याला काही जोड कालवेसुद्धा असतील. त्यातून 41 साठवण तलावात पाणी नेण्यात येईल. 31 साठवण तलाव नव्याने बांधण्यात येणार असून उर्वरित 10 तलाव अस्तित्वात आहेत त्यांचा समावेश करण्यात आला, यातील काही तलावांची उंचीही वाढविण्यात येणार आहे.

जलअभ्यास डॉ. प्रवीण महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 3 नोव्हेंबर 2014 ला पत्र देवून प्रथम मागणी केली होती, त्यानुसार या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी भारत सरकारच्या, जलसंसाधन नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय जलविकास अभिकरणाला जलसंपदा विभागाने कळविले होते. त्या सविस्तर अहवालावर महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कार्यालयातून 27 फेब्रुवारीला शासनास सर्व अभ्यास करून प्रकल्प साकारण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देत, प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल केलेला आहे. 3 लाख 71 हजार 277 हेक्टर असलेला हा भव्य दिव्य नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होईल.

असे असणार प्रकल्पाचे वैशिष्ट्य

गोसीखुर्द धरण ते नळगंगा धरण या 426.542 किलोमीटर लांबीच्या कालव्यावर 7 बोगद्यांची योजना असून या बोगद्यांचे अंतर 13.83 किलोमीटर राहील,  काही ठिकाणी पीडीएनच्या माध्यमातून 25.98 किलोमीटर पाणी जाईल. 386.73 किलोमीटरचा कालवा हा खुला असेल. या सर्व योजनेत 6 ठिकाणी पंपांच्या साह्याने पाणी उचलून टाकण्यात येणार असून या लिफ्टची उंची 155 मीटर असेल. 88 हजार 575 कोटी रूपये किंमत असलेला हा विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असेल. या भव्य दिव्य नदी जोड प्रकल्पाची सुरुवात लवकरच होणार आहे.  राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती जलसंपदा विभाग नाशिक यांनी 27 फेब्रुवारीला मान्यता देऊन या प्रकल्पा ला हिरवी झेंडी दिली.

प्रकल्पासाठी भूसंपादन हे 28 हजार 41. 30 हेक्टर जमीन लागणार असून त्यात खाजगी जमीन 18768 हेक्टर असेल. शेतजमिनी 7591.80 हेक्टर आहे. खाजगी जमीन 18768 हेक्टर लागणार आहे. 395.30 हेक्टर वन जमिनीची आवश्यकता या प्रकल्पासाठी राहील. पडीक असलेली जमीन 736.50 हेक्टर असेल.  या नदी जोड मार्गावर शासनाची असलेली 609 हेक्टर जमीन लागणार आहे. 201.80 हेक्टर जमीन ही रहिवासी क्षेत्रातली येत आहे, तर जलसाठे असलेली 38.90 हेक्टर जमीनीचा यात समावेश असेल. वैनगंगा - नळगंगा नदी जोड मार्गावर सहा जिल्हे येत असून, 15 तालुक्यांचा यात समावेश होत आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे 26 गावे पूर्णता बाधित होणार असून 83 गावे हे अंशता बाधित होतील असा पूर्व अंदाज आहे. संपूर्ण 109 गावांतर्गत 11166 गावकरी बंधू बाधित होणार असून यात एकूण कुटुंब संख्या ही 2646 असेल.

जल अभ्यासक डॉ प्रवीण महाजन यांनी सांगितले की, आज विदर्भासाठी, विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी, दहा-पंधरा दिवस पिण्यासाठी पाणी नसणाऱ्या भागातील भगिनींसाठी, नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, अनेक दिवस वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता कधी मिळते याची आतुरतेने वाट होती. गली 8 वर्ष सतत दोन्ही सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पाला रेटण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न, आज फळाशी आला आहे.