Narendra Modi
Narendra Modi Tendernama
विदर्भ

हा तर महाराष्ट्राच्या 'समृद्धी'चा महामार्ग!...असे का म्हणाले मोदी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. कोणताही पायाभूत सुविधांचा प्रकल्प साकारताना त्याला ह्युमन टच देणे आवश्यक असते. डबल इंजिन सरकारमुळे विकासाला गती मिळाली आहे. समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्धाटन रविवारी मोदींच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

राज्याला आणि विशेषतः विदर्भवासियांना प्रतिक्षा असलेल्या बहुचर्चीत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही अनेक नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाबरोबरच नागपूरमधील मेट्रोच्या फेज वनचे लोकार्पणही केले. यावेळी त्यांनी स्वतः तिकीट काढून मेट्रोतून प्रवास केला.

समृद्धी महामार्गाचा प्रवास

- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

- मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला आणि वाहतूक, दळणवळण, उद्योग, व्यापार यांना चालना देणारा प्रकल्प

- सध्या मुंबई ते नागपूर अंतर कापण्यास सुमारे 14 तास लागतात. सुमारे 812 किमी अंतर लागते. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर हे अंतर 700 किमी होईल आणि फक्त 8 तासात मुंबई ते नागपूर अंतर कापणे शक्य होईल. यासाठी देखरेख एजन्सी म्हणून एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ)

- समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई

- जवळपास 26 तालुके आणि 392 गावांचा संबंध समृद्धी महामार्गाशी येणार आहे.

- समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.

- महामार्गाची एकूण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही 22.5 मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे.

- प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही.

- महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे.

- जवळपास 50 पेक्षा जास्त उड्डाणपुल, 24 हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच 5 बोगदे प्रस्तावित आहेत.

- हा महामार्ग खाजगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे

- युद्धजन्य परिस्थितीत अथवा नैसर्गिक आपत्ती दरम्यान महामार्गावर विमान उतरु शकेल असा रन वे असणार आहे.

- समृद्धी महामार्ग हा रोजगार निर्मितीचे महत्त्वाचे काम करणार आहे. तब्बल 25 लाख रोजगाराची संधी उपलब्ध होईल असा दावा आहे.

- या प्रकल्पासाठी तब्बल ६० हजार कोटीहून अधिकचा खर्च येणार आहे.