Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : काय आहे 16 लाख कोटी रुपये वाचविण्याचा फॉर्म्युला? काय म्हणाले गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.

लवकरच इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध होतील. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लवकरच इथेनॉल वेंडिंग पंप बसवणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल. इंधन आयात करण्यासाठी लागणारे 16 लाख कोटी रुपये वाचतील, असे गडकरी म्हणाले.

ॲग्रो व्हिजन प्रदर्शनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वर्धा येथील एमएसएमई केंद्राने दीड लाख रुपयांचे मशिन विकसित केले आहे. ज्याद्वारे बांबूचे छोटे तुकडे करता येतात. याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या जागी फीडस्टॉक म्हणून करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.

ॲग्रो व्हिजनच्या चार दिवसीय प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. ‘ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी एक नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल या माध्यमातून शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यात यश आल्याचे फडणवीस म्हणाले.

मध्य भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या 'ॲग्रो व्हिजन'चे 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. विषमुक्त शेती ही संकल्पना आता रुजायची गरज आहे. शासन स्तरावरून येत्या दोन वर्षांत सुमारे 35 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे.

यासोबतच जलसंधारणाच्या कामासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. 22 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कामे करण्यात आली आहेत. यामुळे शेतक-यांना दरवर्षी दोन ते तीन पीके घेणे शक्य झाले आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला असून, अवर्षणग्रस्त भागात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत पहिल्या टप्प्यात जागतिक बँकेने 4 हजार कोटी रुपये दिले आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश करण्यात आला होता. आता दुस-या टप्प्यात 6 हजार कोटी रुपये मिळाले असून, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे. 

शेतक-यांची वर्षभर दिवसा वीज देण्याची मागणी असते. त्यादृष्टीने शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. नागपुरात जागतिक दर्जाच्या ॲग्रो कन्व्हेंशन सेंटरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या काळात ॲग्रो व्हिजन प्रदर्शन या कन्व्हेंशन सेंटरमध्ये घेता येईल. संत्र्याच्या निर्यातीवर बांगलादेशने आकारलेल्या शुल्कामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. लवकरच शासन स्तरावर निर्णय घेत शुल्कासंदर्भात शेतक-यांना दिलासा देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.