Electricity
Electricity Tendernama
विदर्भ

Nagpur : 223 कोटी कुठे केले खर्च; अजून वीज यंत्रणा भूमिगत का नाही?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत 223 कोटी रुपये खर्च करूनही शहरातील अनेक भागात वीज यंत्रणा भूमिगत करण्यात आलेली नाही. दाट लोकवस्तीच्या अनेक भागात विजेच्या तारा आकाशात लोंबकळत आहेत. या भागात विजेचे खांबही उन्मळून पडू लागले आहेत. विशेषतः जोरदार वारा आणि पावसात विजेच्या खांबामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. याशिवाय शहरातील सुमारे 19 रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे 1258 विद्युत खांब हटविण्यासाठी 146 कोटींची तरतूद करण्यात आली होती. ज्याची 50 टक्के रक्कम महावितरणने उचलायची होती तर उर्वरित 50 टक्के रक्कम महापालिकेला द्यायची होती.

रस्त्यावरील 1258 विद्युत खांब हटविण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली. त्यासाठी आतापर्यंत सुमारे 68 कोटी रुपये महावितरणने महापालिकेच्या खात्यात जमा केले आहेत. असे असतानाही हे 1258 विद्युत खांब रस्त्यावरून हटवता आले नाहीत. शहरातील गणेशपेठ, महाल, सक्करदरा, गोधनी, कोराडी रोडसह जवळपास सर्वच भागात रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब हटविण्याची जबाबदारी महापालिका आणि महावितरणची असून, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

महावितरण 50 टक्के रक्कम उभारणार

2010 मध्ये महापालिका आणि महावितरण यांच्यात असा निर्णय झाला होता की, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिका 50 टक्के रक्कम खर्च करणार असून महावितरण 50 टक्के रक्कम जमा करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महावितरणने ग्राहकांच्या बिलात 6 पैशांनी वाढ करून 45 कोटी रुपये जमा केले. महावितरणने ही रक्कम महापालिकेच्या खात्यात जमा केली. उर्वरित रक्कम महापालिकेने उभारायची होती, मात्र निधी उपलब्ध न झाल्याने महापालिका आपला हिस्सा देऊ शकली नाही. सुरुवातीला या प्रकल्पासाठी 96 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. काळाच्या ओघात खर्च वाढला आणि प्रकल्प 146 कोटींवर पोहोचला. खर्च वाढल्याचे कारण देत महापालिकेने महावितरणकडे 23 कोटी रुपयांची वाढीव मागणी केल्याने महावितरणने पुन्हा ग्राहकांच्या बिलात काही पैशांनी वाढ करून ही रक्कम वाढवली. अशाप्रकारे निधी उभारूनही शहरातील रस्त्यांच्या मधोमध विद्युत खांब हटविण्यात आलेले नाहीत.

योजनेवर 223 कोटी खर्च

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेवर आतापर्यंत 223 कोटी खर्च केले आहेत. या रकमेतून अनेक भागात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. तर शहरातील काही दाट लोकवस्ती आणि त्या 19 रस्त्यांची अवस्था अजूनही जैसे थे आहे. येथे रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या विद्युत खांबामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या खांबांना धडकून अनेक जण अपघाताचे बळी ठरले आहेत.