Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील 'हे' शहर लवकरच बनणार देशाचे लॉजिस्टिक हब

एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनीचा उद्योग विभागासोबत 3 हजार कोटींचा करार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): राज्य शासनाने उद्योगांसाठी पुरक असे लॉजिस्टिक धोरण आणले आहे. उद्योग क्षेत्रात उत्तम दळणवळच्या सोयी उपलब्ध करून देत लॉजिस्टिक दर कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करते आहे. एक्सएसआयओच्या माध्यमातून नागपूर शहराला देशाचे लॉजिस्टिक हब बनण्याच्या दिशेने गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत 3 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

येथील समृद्धी माहामार्गालगत वडगाव परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कचे भूमिपूजन व शिलान्यास करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार समीर मेघे आणि डॉ. आशिष देशमुख, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगम, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल, ब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, ब्रिटिशांनी नागपूरला भौगोलिकदृष्ट्या झिरो माईल हे मध्य भारताचे केंद्र बिंदू म्हणून घोषित केले होते. आता हे शहर देशाचे लॉजिस्टिक हब होण्याच्या मार्गाने पुढे जात आहे. एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टीक पार्कच्या माध्यमातून या कार्यास गती मिळेल. नागपूर हे नागरी विमान क्षेत्रातही पुढे जात आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानांच्या फेऱ्या या शहरात दररोज होत आहे. समृद्धी महामार्गामुळे उद्योग क्षेत्रातील दळणवळास चालना मिळाली आहे.

समृद्धी महामार्गालगतच एक्सएसआयओ हा 700 कोटी गुंतवणूकीचा लॉजिस्टिक पार्क हा जागतिक दर्जाचा पार्क उभारला आहे. 105 एकरावरील दुसऱ्या टप्प्यातील 1100 कोटी गुंतवणूकीच्या उद्देशाने तयार करण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक पार्कचे भूमिपूजन झाले आहे.

या दोन्ही टप्प्यातून जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. ही आनंदाची बाब असून उद्योग क्षेत्रातील वस्तूंना देशांतर्गत तसेच जागतिकस्तरावर पोचविण्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत समृद्धी मार्गावरील इगतपुरी भागातून वाढवण बंदरापर्यंत जोडण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन लॉजिस्टिक आणि ब्लॉकचेनची सांगड घालून या क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. एक्सएसआयओ राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याने राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान ठरेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याच्या विविध भागात गुंतवणुकीसाठी एक्सएसआयओ इंडस्ट्री व ब्लॅकस्टोन कंपनी आणि उद्योग विभागासोबत 3 हजार कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यापूर्वी राज्य शासना सोबत 5 हजार कोटींचा सामंजस्य करार झाला आहे. आता राज्यातील गुंतवणुकीची ही रक्कम 3 हजार कोटींनी वाढून 8 हजार कोटी करण्यात आली आहे. तत्पूर्वी, एक्सएसआयओ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आणि ब्लॅक स्टोन कंपनीचे तूहीन पारेख यांनी मनोगत व्यक्त केले.