Gondia Hajrafall
Gondia Hajrafall Tendernama
विदर्भ

Gondia : हाजराफॉल पर्यटन स्थळाच्या विकासाला मुहूर्त कधी मिळणार?

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : गोंदिया जिल्ह्यातील प्रथम पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून हाजराफॉल ओळखले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांना रोमहर्षित करते. परंतु या परिसरात पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे.

हा परिसर आकर्षिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटकांच्या सोयीसुविधांबरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक गोष्टींसाठी शासनाने निधी दिल्यास चांगला विकास होऊ शकतो. एवढेच नव्हे तर या भागातील शेकडो युवकांना रोजगारसुद्धा प्राप्त होऊ शकतो. या परिसराचा विकास करण्यासाठी वनविभागाने दहा कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दहा कोटी मंजूर होऊ शकले नाहीत. 

गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेला दरेकसा येथील हाजराफॉल धबधबा एक नैसर्गिक पर्यटन स्थळ असून या ठिकाणी तीन नाल्यांचे वाहणारे पाणी एकत्रितपणे उंच पहाडावरून खाली पडताना रोमहर्षक दृश्य निर्माण होते. या परिसरात आल्यावर प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तीला रोमहर्षक अनुभूती होते. गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर सालेकसा तालुक्यात स्थित हा धबधबा महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड - राज्याच्या सीमेवर आहे. धबधबा पाहण्यासाठी तिन्ही राज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने वर्षभर येथे हजेरी लावतात.

पावसाळ्यात तर या पर्यटन स्थळी पर्यटकांची एकच गर्दी असते. दिवसभर हौसी महिला, पुरुष, तरुण-तरुणी यांची रेलचेल असते. हाजराफॉल परिसरात साहसिक खेळांचे अनेक साहित्य बसविण्यात आल्यामुळे लहान मुले ही आपल्या आईवडिलांच्या सोबत हाजराफॉल येथे येण्यास उत्सुक असतात. पर्यटन विकास विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास एक मोठे रोजगाराभिमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

एक्स्प्रेस गाड्यांना हवा थांबा :

हाजराफॉल हे पर्यटनस्थळ मुंबई-हावडा रेल्वे मार्गाला लागून असून दरेकसा रेल्वे स्टेशनवरून एक किलोमीटर अंतरावर आहे. परंतु दरेकसा येथे केवळ लोकल गाड्यांचा थांबा असल्यामुळे दूरचे पर्यटक या ठिकाणी थेट पोहोचू शकत नाही. पर्यटन विकास साधताना रेल्वे स्टेशनवर काही एक्स्प्रेस गाड्यांचा थांबासुद्धा होणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त परिसरात निवास आणि भोजनाची सोय नसल्यामुळे पर्यटक या परिसरात जास्त वेळ थांबून या परिसराचा हवा केवढा आनंद घेऊ शकत नाही.