Vedanta
Vedanta Tendernama
विदर्भ

भाजपच्या राजकारणाने राज्याचे 10 लाख कोटीचे नुकसान?, कोणी केला आरोप

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : निवडणुकीच्या काळात गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून पळविलेल्या सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या करारातून फॉक्सकॉन कंपनीने माघार घेतल्याने महाराष्ट्राचे तब्बल 10 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केला आहे.

वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा हा प्रकल्प पुणे येथे प्रस्तावित होता. गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक असल्याने तो महाराष्ट्रातून पळविण्यात आला होता. आता फॉक्सकॉन कंपनीने या प्रकल्पात गुंतवणूक करण्यास नकार दिला आहे. भाजपच्या राजकारणामुळे हे सर्व घडल्याचा आरोपही लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केला. हा प्रकल्प पुण्यात स्थापन करण्यासंबंधीत जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती. या प्रकल्पात दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख लोकांना रोजगाराची संधी मिळणार होती. केवळ राजकीय स्वार्थासाठी केंद्र सरकारने या प्रकल्पाचा बळी दिल्याचे लोंढे यांनी सांगितले.

या प्रकल्पात 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. दोन्ही कंपन्यांनी गेल्यावर्षी करार केला होता. वेदांता समूहासोबतच्या भागीदारीतील गुजरातमधील सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली. सोमवारी निवेदनाद्वारे फॉक्सकॉनने हे जाहीर केले. या प्रकल्पासाठी आणखी एक तंत्रज्ञान भागीदार आवश्यक होता. तो मिळविण्यास संघर्ष करावा लागत असल्याने फॉक्सकॉन यातून बाहेर पडली आहे. झालेल्या करारात वेदांताचा 60 टक्के, तर फॅक्सकॉनचा 40 टक्के वाटा होता. फॉक्सकॉनने म्हटले की, आम्ही भारताच्या 'मेक इन इंडिया' पुढाकाराला समर्थन देतच राहु.

मायक्रॉनही संकटात?

फॉक्सकॉन व वेदांता कंपनीचा करार संपुष्टात आल्याने मायक्रॉनच्या सेमिकंडक्टर प्रकल्पाचे भवितव्यसुद्धा धोक्यात आले आहे. याशिवाय विदेशी गुंतवणुकीवरसुद्धा याचा विपरित परिणाम होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने श्वेत पत्रिका जारी करावी अशी मागणी लोंढे यांनी केली.