Nagpur
Nagpur Tendernama
विदर्भ

नागपूरमधील ५० टक्के मॉल बंद कारण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : मॉल संस्कृती चांगलेच बाळसे धरले असताना मागील दीडदोन वर्षात झालेल्या आर्थिक घडामोडींमुळे धडाधड मॉल बंद होत आहेत. यास नोटांबदी, मंदी आणि कोरोना कारणीभूत असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे प्रचंड स्पर्धा वाढल्याने मॉल मेंटनन्स खर्च परवडत नसल्याचेही कारण व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

आजच्या घडीला शहरात फक्त १० टक्के मॉल चांगले चालत आहे. ४० टक्के मॉलचा दर्जा यथातथा आहे. तर ५० टक्के मॉलची स्थिती बिकट झालेली आहे. लोकांना मॉलच्या एका छताखाली सगळे काही हवे आहे- खरेदीचा आनंद, माफक दरात चीजवस्तू, करमणूक आणि मागणी तसा पुरवठा हे बाजाराचे तत्त्व असते. या तत्त्वाचा ज्याला विसर पडतो, त्याचा बाजार उठतो. हे तत्त्व मॉललाही लागू होत होते. शहरात बासीव ते पंचवीस वर्षापूर्वी सदर पूनम मॉल पहिल्यांदा सुरु झाला. त्यानंतर रामदासपेठ येथे सुरु झालेल्या मॉलनंतर शहरात विविध ठिकाणी मॉलची संस्कृती रुजली. आता मात्र, शहरातील वीस ते बावीस मॉल झपाट्याने उभे राहिले खरे, परंतु अल्पावधीत यापैकी अनेक मॉल्सचे शटर खाली आले. तर काही मॉल रडतखडत सुरू आहेत. शहरातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच मॉल आपला लौकिक टिकवून ठेवून आहेत. ढिसाळ व्यवस्थापन, मालकी हक्काचे चुकीचे वाटप, गुंतवणूकदारांची मनमानी, ग्राहकांच्या गरजेकडे दुर्लक्ष, अंतर्गत रचना अर्थात इंटेरिअरबाबत उदासीनता, आसपासच्या परिसराचा-स्थानकांच्या क्रयशक्तीबाबत अभ्यासाचा अभाव आणि निव्वळ स्पर्धा या प्रमुख कारणांमुळे अनेक मॉल्स डबघाईला आलेत. तर काही तर बंदच पडले.

मॉल उभारल्यावर त्याचा मालकी हक्क किती जणांकडे आहे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. कोणा एकाकडेच मालकी हक्क असतील तर एकसूत्रता राहते, व्यवस्थापनात नियोजन राहते, मॉलमधील गाळे कुणाला द्यायचे याचे निर्णय स्वातंत्र्य असते, लोकांना आकर्षित करण्याकरिता मॉलमध्ये कोणते इव्हेंट कधी करायचे याचे स्वातंत्र्य असते. परंतु, मालकांनी हे स्वातंत्र्य स्वतःकडे ठेवले नाही. त्यांनी मॉलचा ताबा गुंतवणूकदारांकडे दिला. जास्तीत जास्त फायदा होत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार स्वतःकडील प्रॉपर्टी कधीच विकत नाही. निवासी संकुलातील काही गाळे हे गुंतवणूकदारांचे असतात. प्रत्यक्ष मालकाकडून ग्राहकाने घेतलेले घर आणि गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या घराच्या दरापेक्षा कमी असते. कारण गुंतवणूकदार जास्त फायदा मिळेल, तेव्हाच विक्री करत असतो. हाच प्रकार मॉलच्या व्यवस्थापनात दिसून आला. फायद्याचा विचार करून गुंतवणूकदारांनी आपले गाळे कुणालाही विकले.