Vanrai Bandhara
Vanrai Bandhara Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Vanrai Bandhara नाशिक विभाग राज्यात अव्वल; लोकसहभागातून केली करामत

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक विभागात लोकसहभागातून वनराई बंधारे (Vanrai Bandhare) बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. विभागात लोकसहभागातून 6 हजार, 134 बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून विभागामध्ये एकूण 1,227 सहस्त्र घन मीटर पाणी अडवले. या वनराई बंधाऱ्यांमुळे 12 हजार 268 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे.

पारंपरिक पद्धतीने पाणी अडवून पाण्याचा साठा करून बिगर पावसाळी हंगामातील पिकासाठी पुरवणे खूप गरजेचे असून त्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यातचा निर्णय कृषी विभागाने घेतला होता. यामुळे ऑक्टोबरपासून लोकसहभागातून बंधारे बांधण्याचे काम सुरू झाले. वनराई बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग भूजल पातळीत वाढ होण्यासाठी होतो. तसेच वनराई बंधाऱ्याच्या पाणी साठ्यांमधून पाण्याचा उपसा करून रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला, कडधान्य, कलिंगड, तृणधान्य, गळीत धान्य सारखी पिके घेण्यासाठी मदत होते.

एका वनराई बंधाऱ्याद्वारे सरसरी 2 हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन उपलब्ध होणार आहे, अशी माहिती नाशिक विभागाचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी तथा विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिली.

नाशिक विभाग राज्यात प्रथम

विभागात आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 3 हजार 755, धुळे जिल्ह्यात 608, नंदूरबार जिल्ह्यात 1 हजार 340, जळगाव जिल्ह्यात 431 असे 6 हजार 134 वनराई बंधारे बांधण्याचे काम लोकसहभागातून पूर्ण करण्यात आले आहेत. राज्यात नाशिक कृषी विभागाने सर्वात जास्त वनराई बंधारे बांधण्याचे काम श्रमदानातून व लोकसहभातून पूर्ण केल्यामुळे नाशिक विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.