Godavari River
Godavari River Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील 'ही' योजना मार्गी; मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : उर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेस राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, कॉंक्रिटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ सूप्रमा मिळावी यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात या प्रकल्पाला सुप्रमा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.

पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या मांजरपाडा (देवसाने) योजनेसह इतर सर्व प्रवाही वळण योजना, पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी- डोंगरगाव कालवा, ओझरखेड डावा कालव्याचा समावेश ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये होतो. या ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील मांजरपाडासह काही वळण योजना आणि कालव्यांची कामे निधी अभावी अपूर्ण आहेत.

उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा प्रस्ताव मार्च २०२१ मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडून शासनास सादर झाला होता. या प्रस्तावावर २४ फेब्रुवारी २०२२च्या व्यय्य अग्रक्रम समिती बैठकीत चर्चा होऊन हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, तत्पूर्वी मुख्य सचिवांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेण्यासाठी राज्य स्तरीय तांत्रिक मान्यता समितीने निदर्शनास आणून दिलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने ४ ऑगस्टच्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा क्लिअरन्स प्राप्त करून राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर भुजबळ यांनी विधानसभेत याबाबत आवाज उठवला होता.

या प्रलंबित सुप्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा (देवसाने),धोंडाळपाडा, ननाशी, गोळशी महाजे यासह पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण व कॉंक्रिटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी या प्रकल्पाला सुप्रमा मिळणे अत्यंत आवश्यक होती. या प्रकल्पांची अपुरी कामे पूर्ण झाल्यावर प्रामुख्याने दिंडोरी, निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यातील जलसिंचनाला फायदा होणार आहे.