Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नगर-मराठवाड्याने का ठोकलाय नाशिक विरुद्ध शड्डू? नेमका काय आहे वाद?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मराठवाड्यातील (Marathwada) जायकवाडी धरणाचे (Jayakwadi Dam) लाभक्षेत्र तुटीचे असल्याने या धरणाच्या वरच्या भागात पाणी अडवले जाऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) ग्रामपंचायतीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागातर्फे प्रस्तावित बंधाऱ्याच्या कामाच्या टेंडर (Tender) प्रक्रियेला स्थगिती मिळवली आहे. यामुळे नाशिकविरोधात मराठवाडा व नगरची अनोखी युती समोर आली आहे. एरवी कमी पावसाळ्याच्या वर्षात मराठवाड्याच्या विरोधात नगर, नाशिक एकत्र येत असल्याचे चित्र असताना आता नगर-मराठवाडा हे पारंपरिक विरोधक एकत्र आले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील म्हाळुंगी या नदीवर लघुपाटबंधारे विभागाकडून १८ दलघफू क्षमतेचा लघुबंधारा प्रस्तावित केला आहे. या बंधाऱ्यासाठी पाणी उपलब्धतेच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली आहे. म्हाळुंगी नदीवर भोजापूर हे ३६१ दलघफू क्षमतेचे मध्यम धरण आहे. या धरणासाठी पाणलोट क्षेत्रात १२०० दलघफू पाणी उपलब्धता असूनही धरण केवळ ३६१ दलघफू क्षमतेचे असल्यामुळे पावसाळ्यात सांडव्यावरून धरण क्षमतेअधिक पाणी खाली वाहून जात असते.

यामुळे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भोजापूर धरणाची उंची वाढवण्याचा मुद्दा समोर आणला जात असतो. मात्र, उंची वाढवल्यास बागायती शेती पाण्याखाली जाणार असल्यामुळे धरणाची उंची वाढवली जात नाही. यावर उपाय म्हणून भोजापूर धरणाच्या वरच्या भागात तांबट टेक, हिवरे येथे बंधारे बांधण्याबाबत लघुपाटबंधारे विभागाकडून यापूर्वी चाचपणी केली आहे. त्यातूनच सिन्नर तालुक्यातील हिवरे (तवली) येथे १८ दलघफू क्षमतेचा लघुबंधारा प्रस्तावित करून त्याच्या बांधकामाचे १०. ४९ कोटी रुपयांचे ई टेंडर १२ डिसेंबरला प्रसिद्ध केले होते.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील पळसखेडे येथील सरपंच शोभा कांडेकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत त्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानुसार जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात पाच दलघफू क्षमतेपेक्षा अधिक साठ्याचे बंधारे बांधण्यास बंदी असल्याचा मुद्दा उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिला. तसेच सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील लघुबंधाऱ्याच्या टेंडरला स्थगिती देण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत या ई टेंडररला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणीमध्ये लघुपाटबंधारे विभाग या तांत्रिक बाबींची पूर्तता करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भोजापूर धरणातून या पावसाळ्यात तीन हजार दलघफू म्हणजे धरण क्षमतेच्या जवळपास दहापट पाणी सांडव्यावरून वाहून गेले आहे. यामुळे भोजापूर धरणाच्या वरच्या भागात १८ दलघफू क्षमतेच्या बंधाऱ्याचे धरणाच्या साठवण क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच या लघुबंधाऱ्यासाठीची पाणी उपलब्धता दाखला गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या परिपत्रकापूर्वी घेतलेली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील पळसखेडे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गैरसमजातून ही याचिका दाखल केली असल्याचे सांगितले जात आहे.