Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सुरत-चेन्नई महामार्गाचे भूसंपादन दर वाढवण्याबाबत काय म्हणाले नितीन गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : प्रस्तावित सुरत - चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गासाठी (Surat Chennai Expressway) राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. भूसंपदाच्या बदल्यात मिळणारा मोबदला अत्यंत कमी असल्यामुळे शेतकरी जमीन देण्यास विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेट घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी केली.

यावेळी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या निवेदनानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात सध्या सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गासाठीचे भूसंपादनाचा मुद्दा गाजत आहे. भूसंपादनासाठी जाहीर केलेल्या दराविरोधात नुकताच जमिनी धारकांनी मोर्चा काढला. तत्पूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शेतकरी व जिल्हाधिकारी यांच्या बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरात बदल करण्याचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे सांगत जिल्हाधिकारी यांनी दर वाढवून देण्यास नकार दिला.

यामुळे राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची भूमीका मंत्र्यांच्या नजरेस आणून दिली. त्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी नाशिक जिल्ह्यास रस्ते विकासासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने रोजगार निर्मीतीला चालना मिळेल, तसेच जिल्ह्यातील कृषी माल इतर शहरांमध्ये पोहचण्यास मदत होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

चांदवडच्या उड्डाणपुलाची लांबी वाढवा
मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड शहरातील प्रस्तावित उड्डाण पुलास ५० मीटरचे ५ स्पॅन देऊन पुलाची लांबी वाढवण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली. तसेच रेणुका देवी मंदिराजवळ उपरस्ता बनवणे, राहूड घाटात व भावडबारी घाटात नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना व सुधारणा करणे याबाबत चर्चा करण्यात आली.

चाचडगाव टोलचालकाबाबत तक्रार
नाशिक पेठ या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर दिंडोरी तालुक्यात चाचडगाव येथे टोलनाका आहे. या टोलनाका चालकाकडून स्थानिक वाहन चालकांशी हुज्जत घालणे, आदिवासी वाहन चालकांना मारहाण करणे याबाबत अनेक तक्रारी आहेत. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना टोलमधून सवलत मिळावी, या मागणीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बैठक घेतली.

या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांनी टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत मिळावी, तसेच शेतमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून टोल आकारणी करू नये, अशी मागणी केली. यावर गडकरी यांनी गडकरी यांनी पेठ, सुरगाणा, दिंडोरी तालुक्यातील वाहनधारक जनतेस सवलतीबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. यावेळी पेठजवळील कोटंबी व सावळघाटासह अनेक प्रलंबित कामे पूर्ण करण्याचीही त्यांनी मागणी केली.