नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरणाकडून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीवर घाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. या घाटांवर पाणी स्थीर व पुरेसे असावे यासाठी पंचवटीत गोदावरी व नंदिनी यांच्या संगमावर रबर बंधारा उभारण्यात येणार आहे.
या रबर बंधाऱ्याच्या ३६.७२ कोटींच्या कामास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या रबर बंधाऱ्यामुळे तपोवन व टाकळी येथील घाटांवर नदीचा प्रवाह स्थिर राहून पर्वणी काळात भाविकांना स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहू शकणार आहे.
प्रयागराज येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांनी कुंभस्नान केले. यामुळे नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातही २०१५ च्या तुलनेत दुप्पट तिप्पट भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येतील, असा अंदाज बांधून कुंभमेळा प्राधिकरणाकडून भाविकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू आहे.
नाशिकला रामकुंड परिसर गर्दीत असून तेथे एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्नान करणे अशक्य असल्याने तपोवनात नवीन घाट मंजूर केले आहेत. याशिवाय नवश्या गणपती व गंगापूर धबधबा या भागातही घाट मंजूर केले आहेत. यानंतरही गर्दी वाढल्यास तिचे नियोजन करण्यासाठी ओढा रेल्वे स्टेशन येथेही गोदावरीवर घाट मंजूर करण्यात आला आहे.
तपोवन परिसरात घाट मंजूर केले आहेत, पण तेथे पाण्याचा वेग अधिक आहे. तेथे भाविकांना स्नान करण्यात अडचणी येऊ शकतात, हे लक्षात घेऊन प्राधिकरणने नंदिनी-गोदावरी यांच्या संगमावर रबर बंधारा मंजूर केला आहे. या कामासाठी प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी २४ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या रबर बंधाऱ्यामुळे तपोवनात बांधण्यात येणाऱ्या घाटांवर स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहणार आहे. तसेच नंदिनीमध्येही पाण्याचा फुगवटाक्षेत्र निर्माण होणार आहे. शिवाय त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी यांनी तपश्चर्या केलेली असून तेथे मंदिर आहे. याठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. यामुळे नंदिनीवर या भागात ४०० मीटर लांबीचा घाट मंजूर केला आहे.
या कामासाठी डॉ. प्रवीण गेडाम यांनी ७२ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंहस्थ काळात पर्वणीला भाविकांची संख्या वाढल्यास त्या घाटावर स्नान करता येणार आहे.
नंदिनीतील सांडपाणी रबर बंधाऱ्यापलीकडे
नंदिनी या गोदावरीच्या उपनदीचे नाल्यात रुपांतर झालेले आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीपासून या उपनदीत प्रक्रिया न सांडपाणी तर काही ठिकाणी थेट मलजल सोडले जाते. यामुळे संगमावर बंधारा बांधल्यास हे सांडपाणी गोदावरीत मिसळून तपोवनातील घाटांपर्यंत जाऊन पाणी प्रदूषित होण्याचा धोका आहे.
याबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, गोदावरी व नंदिनी यांच्यावरील मलनि:स्सारण केंद्रांतून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त जल बंद वाहिन्यांमधून ते नंदिनी व गोदावरी यांच्या किनाऱ्याने नेले जाणार असून ते पाणी या रबर बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने गोदावरीत सोडले जाणार आहे. नंदिनीमध्ये सांडपाणी जाऊच दिले जाणार नाही, यामुळे रबर बंधाऱ्यात प्रदूषित पाणी जमा होण्याचा प्रश्न येत नाही.