NMC, Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: ज्यांच्यासाठी स्मार्ट पार्किंग टेंडरच्या अटी बदलल्या, तेच ठेकेदार ठरले अपात्र

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी महापालिकेने  स्मार्ट पार्किंग प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या संदर्भातील टेंडर प्रक्रिया पूर्णत्वास जात नसल्याचे सलग तीनवेळा घडले आहे. सुरुवातीला ठेकेदारांचे आक्षेप दूर करण्यासाठी महापालिकेला दोनवेळा टेंडर प्रक्रिया पुढे ढकलावी लागली. त्यानंतर राबवलेल्या तिसऱ्या टेंडरमध्ये हे सर्व पाचही ठेकेदार अपात्र ठरले. यामुळे आता पुन्हा चौथ्यावेळी टेंडर प्रसिद्ध करावे लागणार आहे.

नाशिक शहरात वाहनतळ नसल्याने नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात कायम वाहतूककोंडी असते. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महापालिकेने नाशिक पूर्व व पश्चिम विभागात प्रायोगिकतत्त्वावर सहा चौरस किलोमीटरमधील २२ ऑनस्ट्रीट व सहा ऑफस्ट्रीट असे २८ स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १०० ते १५० मीटर अंतरावर नो पार्किंग व पार्किंगचे स्पॉट विकसित केले जाणार आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून २८ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट पार्किंगमध्ये ४,१५५ वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था असणार आहे. अधिकृत रिक्षा थांबा वगळता अन्य ठिकाणांहून वाहन टोइंग करण्याची मुभा ठेकेदाराला असणार आहे. दंड वसुलीदेखील ऑनलाइन केली जाणार आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातून महापालिका आणि पोलिस विभागाला रॉयल्टी मिळणार आहे.

टोइंगसाठी कमीत कमी ७०० आणि जास्तीत जास्त १,१५० रुपये आकारले जाणार आहेत. या स्मार्टपार्किंगमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठीचे पार्किंग दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी १० ते ६० रुपये, तर चारचाकी वाहनाकरिता २० ते १०० रुपयांपर्यंत प्रती ताशी दर आकारले जाणार आहेत. 

यामुळे झाले फेरटेंडर

महापालिकेने पहिल्या दोनवेळा राबवलेल्या टेंडर प्रक्रियेत महापालिकेला दरमहा उत्पन्न देण्याच्या अटीवर ठेकेदारांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर टेंडरमधील अटी-शर्तीत स्थानिक ठेकेदारांसाठी बदल करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने पार्किंगचे टेंडर रद्द करीत तिसऱ्यांदा फेरटेंडर प्रसिद्ध केले. त्यात रॉयल्टीची रक्कम ३५ लाखांवरून २० लाखांवर आणण्यात आली.

त्यामुळे एकूण पाच ठेकेदार कंपन्यांनी काम करण्याची तयारी दर्शविली. मात्र, तांत्रिक तपासणीत या पाचही ठेकेदार कंपन्या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता चौथ्यांदा फेरटेंडर काढले जाणार आहे.