नाशिक (Nashik): नाशिक-पुणे रेल्वेमार्ग निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या डॉ. अनिल काकोडकर समितीने निर्धारित ६० दिवसांच्या मुदतीत अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करावा, तसेच संबंधित भागातील नागरिकांची जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
आमदार तांबे यांनी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधान परिषदेत नाशिक-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर अभ्यास समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ५ ऑगस्ट रोजी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण मार्गे करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नारायणगाव येथील जीएमआरटीच्या दुर्बिणींना धोका निर्माण होण्याची शक्यता आणि हा मार्ग अव्यवहार्य असल्याचे कारण देत रेल्वेमंत्रालयाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर नाशिक-शिर्डी-पुणतांबे-नगर-चाकण असा पर्यायी मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून त्याच्या डीपीआरलाही मंजुरी मिळाली आहे.
या पर्यायी मार्गाला सिन्नर, संगमनेर, नारायणगाव आणि मंचर येथील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा अभ्यास करण्यासाठी काकोडकर समिती स्थापन करण्यात आली आहे.
सिन्नर, संगमनेर आणि नारायणगावमार्गे रेल्वेमार्ग करण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनावेळी समितीचा अभ्यास ६० दिवसांत पूर्ण करण्याचे तसेच जनसुनावणी घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. या आश्वासनांची पूर्तता करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा निर्णय केवळ तांत्रिक निकष किंवा अंतराच्या आधारे न घेता स्थानिक नागरिकांच्या गरजा, तसेच शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती, व्यापार आणि पर्यटनाला होणारे संभाव्य फायदे लक्षात घेऊन घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी समितीने संबंधित भागात जनसुनावणी घेऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
समितीला ६० दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यातील सुमारे २० दिवस उलटले आहेत. समितीने आतापर्यंत कोणत्या बैठका घेतल्या, कोणत्या बाबींचा अभ्यास केला आणि पुढील कार्यवाहीचे नियोजन काय आहे, याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही तांबे यांनी केली आहे. समितीने निर्धारित मुदतीत शासनाला अहवाल सादर करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
Key Points
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाबाबत काकोडकर समितीने जनसुनावणी घ्यावी,
समितीने ६० दिवसांत अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करावा,
समितीला ५ ऑगस्ट २०२६ रोजी स्थापन करण्यात आले,
समितीच्या स्थापनेची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती,
सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-चाकण मार्गाला स्थानिक लोकप्रतिनिधींचा आग्रह,
नाशिक-शिर्डी-पुणतांबे-नगर-चाकण या पर्यायी मार्गाला विरोध,
रेल्वेमार्गाचा निर्णय स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन घ्यावा,
शिक्षण, रोजगार, उद्योग, शेती, व्यापार आणि पर्यटनाचा विचार करण्याची मागणी,
समितीने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती जनतेला द्यावी,