नाशिक (Nashik): कोणत्याही शहरामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तेथे गर्दीच्या वेळी प्रतितास २० हजारांपेक्षा अधिक प्रवासी संख्या असणे गरजेचे असते. महामेट्रोने नाशिक येथे केलेल्या वाहतूक सर्वेक्षणात 'मेट्रो'साठी आवश्यक प्रतितास वीस हजार प्रवासी संख्येचा आकडा पार झाला आहे. त्यामुळे सिंहस्थनगरीसाठी आता नियमित 'मेट्रो'चा मार्ग मोकळा झाला आहे. (Nashik Metro News)
यापूर्वी नाशिक येथे पुरेसे प्रवासी नसल्याच्या कारणावरून नाशिकला कधी टायरबेस मेट्रो निओ, तर कधी कॉम्पॅक्ट मेट्रोचा प्रस्ताव दिला जायचा. आता या सर्वेक्षणामुळे नाशिकमध्येही मेट्रो सुरू होण्यात कोणतीही तांत्रिक अडचण उरलेली नाही.
नाशिक शहर एकीकडे झपाट्याने विस्तारत असून दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नाही. यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढून पार्किंगसह ध्वनी, वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने सर्व महापालिकांना स्वतंत्रपणे वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार नाशिक महापालिकेचा पहिला सर्वंकष वाहतूक आराखडा २०१६ मध्ये तयार करण्यात आला. त्यावेळी २०३६ च्या लोकसंख्येचा विचार करून आराखड्याचे नियोजन करण्यात आले होते. सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूकधोरण, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक,रस्तेविकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा त्यात समावेश होता. 'अर्बन मास ट्रान्झीट' या दिल्लीस्थित कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता.
त्यातूनच शहरात सिटीलिंक कंपनीची बससेवा सुरू झाली. त्या आराखड्याचाच आधार घेऊन पुढे नाशिकसाठी 'टायरबेस मेट्रो निओ'ची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी २१०० कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला होता. परंतु, गेल्या पाच वर्षांपासून ही मेट्रो प्रत्यक्षात आली नसल्याने आता नियमित 'मेट्रो'चा विचार सुरू झाला आहे.
याबाबतचा आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे सादर करण्यात आला. त्याचे सादरीकरण मंत्रालयात होणार होते. मात्र, ती बैठक पुढे ढकलल्याने हे सादरीकरण लांबले आहे.
उशीर पथ्यावर
यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात नाशिकला गर्दीच्या काळात प्रतितास १४ हजार प्रवासी आढळले होते. त्यानुसार नाशिकला टायरबेस मेट्रो प्रस्तावित केली होती. मात्र, त्याबाबत काहीही प्रगती न झाल्याने नवीन पर्यायांचा शोध सुरू झाला. त्यानुसार 'महामेट्रो' ने नाशिकचा वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कोलकातास्थित कंपनीने तीन महिन्यांनंतर वाहतूक आराखडा तयार केला. त्यात नाशिकमध्ये प्रतितास २० हजार प्रवासी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे निओ मेट्रोसाठी झालेला उशीर नाशिककरांच्या पथ्यावर पडला आहे.